मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकमध्ये आज मविआची महत्वाची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत आगामी काळातील वाटचालीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. बैठक संपल्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेत याबद्दल खुलासा केला. या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जयंत पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ‘महाविकास आघाडीच्या सभा उन्हाळा झाल्यानंतर घेतल्या जातील. तिन्ही पक्ष लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांसाठी जागा वाटपाची बोलणी करणार आहोत. यामध्ये तीन पक्षांसह आघाडीचे घटकपक्ष असणार आहेत. एक ठाम पर्याय जनतेसमोर देण्यावर आजच्या बैठकीत एकमत झाले असून, आगामी काळात आम्ही आणखी ठाम पणे काम करणार असल्याचं यावेळी जयंत पाटील यांनी सांगितलं.
तसेच, पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, ‘कर्नाटकच्या जनतेमध्ये भाजप विरोधात रोष होता तो मतपेटीतून व्यक्त झाला आहे. कर्नाटकमधील जनतेने मोदी-शाह यांच्यावरचा राग काढला आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. पुढील सभा पुण्यात होणार असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार पुण्यातील सभेत करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
तर दुसरीकडे संजय राऊत यांनी महाराष्ट्रात 100 टक्के भ्रष्टाचार सुरु आहे असा आरोप केला. आम्ही मजबूत आहोत, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असहाय्य आहेत. असल्याचं त्यांनी म्हंटलं. जसं कर्नाटकात जिंकलो…त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार आहे. मविआमध्ये जागा वाटप होणार. त्याची चिंता इतरांनी करू नये’, असेही राऊत यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंतराव पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, संजय राऊत, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, भाई जगताप इत्यादी नेते उपस्थित होते.