ढेबेवाडी – राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नामुळे महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बनपुरी, ता. पाटण येथील श्री नाईकबा देवस्थांनाकडे जाणाऱ्या घाट मार्गातील धोकादायक स्थिती आणि अधून मधून तेथे निर्माण होणारी वाहतुकीची कोंडी लवकरच दूर होणार आहे. आणखी सुमारे तीन कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने घाटरस्ता रुंदीकरणात सह अन्य अनुशंगिक कामे तसेच वाहन तळाचे कॉंक्रिटीकरण मार्गी लागणार आहे.
डोंगर माथ्यावर असलेल्या श्री नाईकबा देवाच्या चैत्रात होणाऱ्या यात्रेस भाविक लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. यात्रेनंतरच्या पाकळण्या, तसेच प्रत्येक रविवारी, आमवस्या-पौर्णिमेस आणि नवरात्रोत्सवात गर्दीचा ओघ कायम असतो. श्री नाईकबा मंदिराकडे जाण्यासाठी घाटमार्ग व पायरी मार्ग असून वाहनातून येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याने घाटमार्गाचाच सर्वाधिक वापर होताना दिसतो.
बनपुरीचे सरपंच मनोज पाटील म्हणाले, दिवसेंदिवस भाविकांचा ओघ व घाटातील वाहतुकीचा ताण वाढत असल्याने वाहतुकीच्या कोंडीसह भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. तीव्र वळणे, अरुंद रस्ता, सूचना फलक व स्ट्रीट लाईटचा अभाव असल्याने सद्यस्थितीला तेथे वाहन चालकांचा गोंधळ उडताना दिसतो. या पार्श्वभूमीवर मंत्री देसाई यांच्या माध्यमातून पुन्हा सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. यातून आजूबाजूचे अडथळे हटवून रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण, संरक्षक कठडे आदी. कामे होवून घाटमार्ग रुंद व सुरक्षित तर बनेलच, शिवाय डोंगर माथ्यावरील वाहन तळाचे कॉंक्रिटीकरणही करण्यात येणार असल्याने मोठ्या समस्येतून वाहन चालक व भाविकांची सुटका होणार आहे.
सध्या या वाहनतळावर माती असल्याने उन्हाळ्यात धुळीचा तर पावसाळ्यात चिखलाने होणाऱ्या दलदलीचा त्रास जाणवतो. बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य महेश पाटील इन्फ्राटेक कंपनीने प्रत्यक्ष घाटातील कामाला सुरवात केली आहे. श्री नाईकबा घाटमार्गात यापूर्वी मंत्री देसाई यांच्या माध्यमातून तीन कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यातूनही अनेक कामे मार्गी लागली. घाट रस्त्याशेजारी असलेल्या श्री नाईकबा विद्यालयाला भव्य संरक्षक भिंतीचे संरक्षण मिळाल्याने तेथेही सुरक्षितता आली आहे. आता नव्याने मंजूर आणखी तीन कोटीच्या कामामुळे घाटमार्ग वाहतुकीच्या दृष्टीने भाविक व वाहन चालकांसाठी टेन्शनफ्री होईल, असा विश्वासही सरपंच पाटील यांनी व्यक्त केला. श्री क्षेत्र नाईकबा येथील भाविकांचा प्रचंड ओघ लक्षात घेवून आवश्यक उपाययोजना हाती घेण्यास पूर्वीपासूनच प्राधान्य दिले असून यापुढच्या काळातही हेच धोरण कायम ठेवत याठिकाणचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देणार आहे.