दिल्लीत भेटा; एके-47 ने उडवून देतो, अशी धमकी चक्क खासदाराला येते आणि कुणीतरी दारूच्या नशेत ही धमकी दिली होती, असं सांगितलं गेल्यावर एवढ्या गंभीर विषयाचा कॉमेडी शो होऊन जातो.
यापूर्वीही अशा धमक्या येऊन गेलेल्या असल्यामुळे सरकार गंभीर नाही, अशी तक्रार संबंधित खासदाराला करावी लागते. त्यावरूनही फक्त राजकारण रंगतं… खरोखर शॉकिंग आहे ना? राज्यात रोज कोणत्या ना कोणत्या राजकारण्याला किंवा सेलिब्रिटीला धमकी दिली जाते. खासदार संजय राऊतच नव्हे तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार जितेंद्र आव्हाड, रुपेरी पडद्यावरचा हिरो सलमान खान या सगळ्यांना धमक्या येतात आणि पोलिसांना काहीच क्लू मिळत नाही.
इकडे छत्रपती संभाजीनगरात दंगल नेमकी कुणी घडवून आणली, हेही पोलिसांना कळत नाही आणि राजकारण्यांना मात्र ते अचूक कळतं. विशेष म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळी नावं कळतात आणि सगळे राजकारणी एकमेकांकडे बोटं दाखवू लागतात. मात्र, दहा वाहनं गमावलेल्या पोलिसांना कुठलं बोट फॉलो करायचं, हेच समजेनासं होतं. शॉकिंग ना?
अहो, एका खासदाराचा मृत्यू होऊन तीन दिवस उलटत नाहीत, तोवर भावी खासदाराचे बॅनर लागतात, आता बोला! खरंच शॉकिंग ना? मुख्यमंत्र्यांच्या चालकाला आणि भाजी आणून देणाऱ्यालाही सुरक्षा दिली जाते तर ज्यांना धमक्या दिल्या जातात, त्यांना चार हवालदारही मिळत नाहीत अशा तक्रारी होतात म्हणजे काय? एवढं धमक्यांचं सत्र सुरू असतानासुद्धा वादग्रस्त विधानं करणं कुणीच सोडत नाही. सुरक्षेची मागणी करत आक्षेपार्ह बोलतच राहतात आणि शंभर-शंभर कोटी रुपयांचे मानहानीचे दावे हसत-हसत अंगावर घेतात.
कित्ती कित्ती शॉकिंग ना? आता एवढ्या सगळ्या शॉकमध्ये विजेचा शॉक तुम्हा-आम्हाला कसा जाणवावा? फक्त सहा टक्के तर दरवाढ झालीये. देशातल्या कुठल्याही राज्यात जाऊन बघा. विजेचे दर आपल्या महाराष्ट्राच्या तुलनेत कितीतरी कमी आहेत. अहो, मराठी माणसाइतकी ऐपतच नाही हो कुणाची? काही-काही राज्यांमध्ये तर फुकट विजेची रेवडी वगैरे वाटतात. किती हास्यापद ना? फार-फार तर अर्ध्या लोकसंख्येला एसटीचा प्रवास फुकट करावा. त्यामुळं फारसं बिघडत नाही.
काही राज्यांमध्ये पहिले शंभर युनिट वीज फुकट देतात. काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांना वीज फुकट देतात. लोकप्रिय घोषणांचं राजकारण किती करावं, याला काही बंधन आहे की नाही? आमच्याकडे बघा. वीज सहा टक्क्यांनी वाढूनसुद्धा आम्हाला जराही शॉक बसलेला नाही. वादग्रस्त वक्तव्यं आणि वर्तन, एकमेकांवर दाखल केलेले अब्रुनुकसानीचे दावे, टीव्ही चॅनेलवरचे टोले-प्रतिटोले एवढं सगळं असताना वीज दरवाढीचं तुणतुणं कशाला?
तसं बघायला गेलं, तर एक एप्रिलपासून बरंच काही महागलंय. प्रवास महागलाय, कर्ज महागलंय, ऑनलाइन व्यवहार महागलेत; पण मराठी माणूस कसा पहाडासारखा उभा आहे, पाहा! दरवाढीचे वगैरे शॉक आम्हाला कुणी देऊ नयेत. आम्हाला तसूभर फरक पडत नाही. आम्ही आमची राजकीय संस्कृतीच अत्यंत समृद्ध करून टाकलीये. इतकी, की रोज कुणी ना कुणी एखादी शॉकिंग बातमी देतोच. आम्ही नखशिखान्त हादरतो. दिवसभर बातम्या बघत राहिलं की आम्ही आपोआप शॉकप्रूफ बनतो, कळलं?