आळंदी – हल्ली पुणे जिल्ह्यात विशेषतः खेड, हवेली, मावळ आणि शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी लग्नसोहळे म्हणजे विनोदाचा आणि कंटाळवाणा विषय झाला आहे. लग्नाची वेळ किंवा मुहूर्त असतो सायंकाळी 6.35, 6.40 आणि ही लग्ने लागतात 7.30, 8.30 कधी दहापर्यंतही. तोपर्यंत काय? बापरे! लग्नमंचावरील निवेदक आणि दोन्ही बाजूंचे संयोजक कार्यकर्ते यांचा जणू त्या स्पीकरवर अक्षरशः नावांचा पाऊसच पडत असतो. प्रत्येकाचा नामोल्लेख करून ही मंडळी स्वागत करतात. किमान तासभर कोणीही थांबायचे नाव घेत नाहीत !
आजी माजी सरपंच, अमुक चेअरमन, तमूक संचालक, नगरसेवक, माजी नगरसेवक, युवा कार्यकर्ते वगैरे वगैरे..! पण यामध्ये खास लग्नासाठी येऊन थांबलेल्या पै-पाहुणे, सगे-सोयरे, नातेवाईक, मित्रमंडळी यांचे कान अक्षरशः थिजून जातात. इकडे लग्नमुहूर्त होऊन तास उलटला तरी नवरदेव महाशयांची मिरवणूक मंडपादारी येत नाही. तोपर्यंत इकडे स्वागत-सरबत्ती चाललेली असते. त्यानंतर वधू-वर वाजत गाजत, कधीकधी एखाद्या सिनेमातील थीमप्रमाणे हे कल्पनेतील राजा राणी मंचावर दाखल होतात. त्यानंतर सुरू होतो जावई, मामा, मध्यस्थ यांचा सत्कार मानपान समारंभ!
जमलेल्या सर्व आजी माजी पुढाऱ्यांना लग्नमंचावर बोलावून होणारा हा कार्यक्रम, म्हणजे गोंधळाचा उच्चांक असतो. कोण कोणाचा सत्कार करतो, कोणालाच कळत नाही. मग कोणीतरी मान्यवर स्वागतासाठी बोलाविले जातात, त्यानंतर आशीर्वाद दिले जातात. यांची संख्या दोन, तीन, चार कितीही असते. अरेरे… काय चाललेय समाजात? आमच्याकडे पैसा आहे, पत आहे, ऐपतही आहे. पण वेळेचे नियोजन नाही. महत्व कशाला आणि कोणाला द्यावे, हेच कळत नाही. यामध्ये साडेसहाच्या मुहूर्ताचे लग्न दीडदोन तास उशीरा करून अखेरीस घाईघाईत उरकण्यात येते. अजून खूप काही सांगण्यासारखे आहे, तूर्तास एवढेच ठीक. पण वेळचा अपव्यय टाळता येईल.
नका बोलावू कोणीच पुढारी लग्नमंचावरती. मानपान, देणग्या, भेटवस्तू यांचे जाहीर प्रकटीकरण गरजेचे नाही. लग्नामध्ये वधूवर, करवल्या, वरमाय, वरबाप, पाहुणे मंडळी यांचे महत्व जपावे, लग्नमुहूर्त लग्नवेळ पाळावी, तो सोहळा अनुपम व्हावा. प्रत्येकाच्या नजरेत भरावा. लग्नकार्यात येणारी प्रत्येक व्यक्ती तोलामोलाची आणि मानाची आहे. त्यात भेदभाव नकोच. वधूवराच्या घरातील प्रमुखांनी लग्नमंडपाच्या दारी हसतमुखाने केलेले स्वागत पुरेसे आहे. निवेदकाने वेगळे स्वागत करण्याची गरजच नाही. त्यापेक्षा मंडपात एखादी मंगलधून लावावी.
मिरवणुकीची हौस जरूर करावी, पण मुहूर्तवेळ पाळावी. आपल्यासाठी येणाऱ्या पै पाहूण्यांच्या परतीची काळजी घ्यावी. लग्नसमारंभ ही कुटुंबाच्या आणि वधुवरांच्या आयुष्यातील अविस्मरणीय गोड आठवण ठरावी. समाजधुरिणांनी याची काळजी घ्यावी असे यातून सुचवासे वाटते, अशी वऱ्हाडी मंडळींमध्ये चर्चा होत आहे.