हिरडस मावळ -भोर तालुक्यातील पश्चिम भाग हा सह्याद्रीच्या रांगांनी व्यापलेला आहे. त्यामुळे या भागातील झाडाझुडपांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रानटी फळांच्या अर्थात रानमेव्याचे अस्तित्व टिकून आहे. यात डोंगरची काळी मैना म्हणून ओळखली जाणारी करवंदे तसेच आळू, आमगुळे, तोरणे या वृक्षांना फुले, फळे येऊन ती बहरली आहेत.
या करवंदाच्या काटेरी जाळ्यांना सुरुवातीस पांढऱ्या रंगाची फुले येतात. त्यांच्या गळतीनंतर हिरव्या रंगाची करवंद बहरून पिकल्यावर त्यांचा रंग काळा होतो. या डोंगराची काळी मैना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवंदांचा गोडवा वाढत्या तापमानामुळे उन्हाच्या चटक्यात मनाला गारवा देणारा ठरतो.
तोंडाला पाणी सुटेल असा चविष्ट, आंबट गोड, साळ करवंदासारख्या रानमेव्याची आठवण उन्हाळ्यात होते. आता कच्ची करवंदे आली असून, जाळ्या हिरव्या करवंदांनी बहरल्या आहेत. करवंद हे बेरीवर्गीय फळ असून, त्याचा आरोग्यासाठीही उपयोग होतो. यामधील अनेक घटक रोगप्रतिबंधांचे काम करतात.
करवंद हे नाशवंत फळ असल्याने जास्त काळ टिकत नाही. मात्र कच्च्या करवंदांचे लोणचे व पिकलेल्या करवंदांचा मुरब्बा केला तर तो मात्र जास्त दिवस टिकतो. येथील नागरिकांना करवंद विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळते. डोंगरांना लागणारे वणवे, वृक्षतोडीमुळे रानमेव्याच्या झाडांची संख्या कमी होत असल्याने या झाडांचे संवर्धन गरजेचे आहे.