थिरूवनंतपूरम – भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी केरळची सत्ताही काबीज करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी व्यक्त केला. त्या वक्तव्यावरून केरळचे राजकारण ढवळून निघाले आहे. मोदी स्वप्न पाहत असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. तर, मोदींची इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार भाजपने केला आहे.
ईशान्येकडील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरूवारी जाहीर झाले. त्या निवडणुकांमधील भाजपच्या कामगिरीने सुखावलेल्या मोदींनी केरळ जिंकण्याचा विश्वास बोलून दाखवला. त्यावर केरळमधील विविध पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. मोदी दिवास्वप्न पाहत आहेत. केरळच्या मागील विधानसभेत भाजपचा केवळ एक आमदार होता. राज्यात 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने ती एकमेव जागाही गमावली.
आता त्या पक्षाची राज्यात अतिशय दयनीय स्थिती आहे, असा सूर केरळमधील सत्तारूढ डाव्या आघाडीतून उमटला. केरळमधील जनता कधीही जातीयवादी शक्तींना पाठिंबा देणार नाही. त्यामुळे भाजपला केरळमध्ये सत्तेची संधी मिळणार नाही, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही.डी.सतीशन यांनी म्हटले. मात्र, जनतेच्या पाठिंब्याने आम्ही मोदींची इच्छा सत्यात उतरवू, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष के.सुरेंद्रन यांनी व्यक्त केला.