मुंबई – राज्यात करोना महामारीच्या काळात 4,253 कैद्यांना विशेष पॅरोल देऊन घरी सोडण्यात आले होते. परंतु त्यांना पुन्हा कारागृहात बोलावले असता त्यापैकी सुमारे 400 कैद्य परतले नाहीत. आता त्यातील 18 जणांना पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. मात्र, अद्यापही सुमारे 350 कैदी फरार आहेत. आता त्यांची शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.
मुंबईचे पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी म्हणाले, करोना काळात गुन्हेगारांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. त्यांना कोविड संपल्यावर पुन्हा हजर राहण्याचे बजाविण्यात आले होते, पण ते परत आलेच नाहीत.मुंबई आणि महाराष्ट्रातील 20 तुरुंगांमध्ये एकूण 35,000 हून अधिक कैदी आहेत. जे तुरुंगांच्या निश्चित क्षमतेपेक्षा जास्त आहेत.
वाढत्या करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता 2020मध्ये राज्यभरातील कारागृहातून 4253 दोषी कैद्यांना गर्दी कमी करण्यासाठी घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र कोविड संपल्यानंतर पुन्हा कारागृहात जाण्याची वेळ आली तेव्हा सुमारे 400 जण फरार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
#विधानसभा : भटक्या कुत्र्यांना आसामला पाठवा; ‘त्या’ मुद्दयावर आमदार कडूंचा सरकारला अजब सल्ला
मुंबई कारागृहातून 72 कैद्यांची सुटकाही झाली, त्यातील काही तुरुंगात परतले तर काही जण परतलेच नाही. त्यामुळे आता त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्यासाठी पोलीस प्रशासन विशेष मोहीम राबवित आहे. या मोहिमेसोबतच मुंबई पोलिसांनी अन्य गुन्ह्यांतील फरार आरोपींनाही अटक केली आहे. यात सुमारे 72 फरारी आरोपींना अटक करण्यात आली आहे.