यांच्या बाबतीत वयाच्या चाळीशी ते पन्नाशीच्या दरम्यानचा अतिशय महत्त्वाचा काळ हा रजोनिवृत्तीचा काळ असतो. बहुतेक स्त्रिया यादरम्यान कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत स्थिरस्थावर होत असतात. त्यांच्या दैनंदिन कामाचे स्वरूप ठरलेले असते. मुले मोठी होऊन स्वावलंबनाने वागू लागलेली असतात. थोडक्यात, प्रत्येक स्त्रीला तिच्या स्वत:च्या तब्येतीसाठी आता थोडा वेळ मिळायला सुरुवात झालेली असते. कामाच्या व्यापातून बाहेर पडायची वेळ येते आणि अचानक काही स्त्रियांना सगळं काही सुरळीत चालू असून देखील उगाचच निरुत्साह अर्थात उदास वाटणे, विनाकारण चिडचिड होणे, कामाचा कंटाळा येणे, घरातील इतर सदस्यांना थंड वाटत असले तरी संपूर्ण अंगाला अचानक घाम येणे, शरीरावर सूज वाटणे, अचानक वजन वाढणे अशा प्रकारच्या तक्रारी सुरू होताना आढळतात. अशातच नियमितपणे सुरळीत येणारी मासिक पाळी अचानकपणे उशिरा यायला सुरुवात होते. म्हणजेच पाळीचे अनियमित चक्र सुरू होते.
वास्तविक वयाच्या या टप्प्यावर मासिक पाळीच्या चक्रात येणारी ही अनियमितता अगदी नैसर्गिक आहे. स्त्रीच्या शरीरातील स्त्री संप्रेरकांची पातळी या वयादरम्यान कमी होऊ लागते. थोडक्यात, तिची प्रजनन क्षमता कमी होते. शरीराचा आतून असणारा नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि एक प्रकारच्या अंतर्बाह्य अवयवांमध्ये कोरडेपणा जाणवू लागतो. परिणामी नियमित येणाऱ्या मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यास सुरुवात होते. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होण्यास सुरुवात होते. हाडांमध्ये ठिसूळपणा येऊ लागतो. हाडांची झीज होण्याची प्रक्रिया वाढीस लागते. पुढे हाडांचे त्रास जसे संधिवात, सांधेदुखी इत्यादी तक्रारी सुरू होतात. अशातच मणक्याचे किंवा आधीचे काही सांध्याचे त्रास असतील तर ते देखील बळावतात.
रजोनिवृत्तीच्या या काळात काही स्त्रियांमध्ये नैसर्गिकरित्या दर महिन्याला 28 ते 30 दिवसांच्या अंतराने येणारी पाळी कमी अधिक काळासाठी पुढे सरकते किंवा अलीकडे येते. या अनियमिततेमुळे पाळीचे “ते दिवस’ लांबतात किंवा कमी होतात. स्त्राव देखील कमी अधिक होण्याची दाट शक्यता असते. रजोनिवृत्तीचा काळ हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात चाळीशी ते पन्नाशीच्या दरम्यान येतो. मात्र, हा काळ किती महिने किंवा किती वर्षे राहील हे सांगणे अवघड आहे. वर नमूद केली लक्षणे ही कमी अधिक प्रमाणात प्रत्येकीच्या आयुष्यात येतात मात्र त्याची तीव्रता बऱ्याच अंशी प्रत्येक स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक जडण घडणीवर अवलंबून असते. काही स्त्रियांच्या बाबतीत मात्र या लक्षणांबरोबर इतरही वेगळी लक्षणे उद्भवू शकतात.
मासिक पाळी जाताना शारीरिक आणि मानसिक बदल घडणे हे अगदी नैसर्गिक आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम या नैसर्गिक बदलाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. या काळात स्त्रीने स्वत:कडे लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे. रजोनिवृत्तीच्या या काळात होणाऱ्या शारीरिक तक्रारींकडे दुर्लक्ष न करता आवश्यक असल्यास तज्ञाच्या सल्ल्याने काही तपासण्या करून योग्य ते औषधोपचार करून घेणे हितकारक ठरते.