बाबा कांबळे, आनंद तांबे यांच्या पाठपुराव्याचे यश
पिंपरी, दि. 7 -टू व्हिलर टॅक्सी रॅपिडो कंपनीला परवानगी दिल्यास बेकायदेशीर प्रवासाला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे या प्रवासी वाहतुकीवर बंदी घालण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देखील कायम केला. या निकालाने लोकशाहीचा विजय झाला असून रॅपिडो कंपनीला दणका बसला आहे. रिक्षा टॅक्सी टुरिस्ट परमिट चालकांना दिलासा देणारा निर्णय असल्याची भावना महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे आणि पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे यांनी व्यक्त केली.
पुण्यात रिक्षा चालक मालकाने एकत्र येऊन एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला. यावेळी बाबा कांबळे बोलत होते, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, भाजपा वाहतूक आघाडीचे अंकुश नवले, जय महाराष्ट्र रिक्षा संघटनेचे गुलाब सय्यद, सावकाश रिक्षा संघटनेचे प्रदीप भालेराव, चंद्रकांत गोडबोले, आप्पा हिरेमठ, सचिन रसाळ, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे मोहम्मद शेख, सुभम तांदळे, अर्शद अंसारी, विलास केमसे, संजय शिंदे, प्रवीण शिखरे, चेतन राऊत, गोरख पो, मौला शेख आदी उपस्थित होते.
प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी मिळावी, यासाठी रॅपिडो कंपनीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याविरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे यांनी इंटरवेशन याचिका दाखल केली. प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहुन पाठपुरावा केला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने रिक्षा चालकांच्या बाजूने निकाल देत रॅपिडोवर बंदी कायम केली. रिक्षा चालकांच्या वतीने ऍड. आनंद लांडगे आणि ऍड. अक्षय देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली.