कापूरहोळ – खेड शिवापूर टोल नाका नियोजित जागेत असता तर स्थानिकांचा टोल देण्याचा विषयच आला नसता; पण पैशाच्या हव्यासापोटी अनेकजण लाचार झाल्याने त्याचा त्रास स्थानिकांना सोसावा लागत आहे. सर्व पक्षीय आमदार, खासदार असताना सत्ता सर्वांनी उपभोगली, मग सत्ता असताना टोलनाका हटवण्यासाठी आजी-माजी सत्ताधाऱ्यांनी मनापासून ताकद लावली नाही. यात काही सामाजिक संस्था आणि स्वयं घोषित सामाजिक कार्यकर्त्यांनी हात धुतले, असा स्थानिक नागरीकानी आरोप केला आहे.
महामार्गाच्या कामाची परिस्थिती पहाता नियोजित कामे झाली का, महामार्गाच्या रोडमॅप, पुलाची कामे, साईडपट्या आणि सोयीसुविधा अद्याप अपूर्ण असून गेली 20 वर्ष स्थानिक गुंडाना हाताशी धरून दिवसाढवळ्या टोलधाड चालू असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा टाकत आहे. यावर कोणताही स्थानिक नेता ठामपणे टोलनाक्याला विरोध करीत नाही. सर्वसामान्यावर होणाऱ्या अन्यायाची दखल घेतली जात नाही.
दरवेळी निवडणुका आल्या की टोल वसुली प्रश्न निर्माण होतो. मग स्थानिक सामाजिक संस्थानी यावर आवाज उठावयाचा, प्रतिनिधींनी यायचे आणि तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक टोल माफ केल्याचा दिखावा करायचा. लोकप्रतिनिधींनी राज्यात व केंद्रात अथवा स्थानिक पातळीवर आवाज उठवला असता तर टोलनाका हद्दपार झाला असता.
बेकायदेशीर आणि वादग्रस्त खेड शिवापुर टोलनाका उभारणीपासून आतापर्यंत बेकायदेशीर टोलवसुली चक्र चालू आहे. महामार्गाचे कामकाज अपूर्ण आहे. स्थानिकांनी कोणीही टोल देऊ नका, याबाबत महामार्ग प्राधिकरण आणि टोलनाका प्रशासनास न्यायालयात खेचणार आहे.
गोंविदराव तनपुरे, सामाजिक कार्यकर्ते
खेडशिवापुर टोलनाका नियोजित जागेवर स्थंलातरीत करा. त्याचबरोबर चारपदरीकरण व सहापदीकरण कामाचे रोडमॅपनुसार कामे पूर्ण करा. महामार्गाची झालेली कामाची गुणवत्ता योग्य असल्याचे पुरावे द्या. अन्यथा एका जरी स्थानिकांस टोलसाठी अडवल्यास अथवा त्रास दिल्यास टोल प्रशासनाच्या विरोधात गुन्हे नोंदवा.
– डॉ. संजय जगताप, संघटक, खेड-शिवापुर टोलनाका कृती समिती