Dinesh Karthik – भारतीय क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत यंदाच्या वर्षाची सुरुवात केली आहे. अगोदर श्रीलंका आणि आता न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ टी-२० मालिका खेळत आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका २-१ने जिंकली. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाने ३-०ने निर्विवाद वर्चस्व गाजवले. या मालिकेनंतर न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वात संघाने ३-०ने यश मिळवले. त्यानंतर आता भारतीय संघ पाहुण्या संघाविरुद्ध ३ सामन्याची टी-२० मालिका खेळत आहे. शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात हार्दिकच्या नेतृत्वातील संघाला पराभव पत्करावा लागला.
INDvsNZT20 | हार्दिक पंड्याच्या रणनीतीवर सवाल; ‘या’ चुका ठरल्या पराभवाचे कारण
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकांसाठी बीसीसीआयने एकदिवसीयसाठी रोहित आणि टी-२० साठी हार्दिककडे नेतृत्व देण्यात आले. त्यामुळे आता भारताच्या पहिल्या पराभवानंतर हार्दिकच्या नेतृत्वाबाबत प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य केले आहे. भारतीय संघ सध्या वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार निवडत आहे.
येणाऱ्या काळात क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असणार का प्रश्नही उपस्थित केला जातोय. याबाबत बोलताना दिनेश कार्तिकने आपली बाजू मंडळी आहे. ‘वेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार ही रणनीति यशस्वी होते का, हे आगामी एकदिवसीय विश्वचषकानंतर समजेल’, असे कार्तिकने म्हटले आहे.
‘आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की एकदिवसीय विश्वचषकापर्यंत भारतीय संघाला बहुतेक टी-20 सामने खेळायचे आहेत. त्याचबरोबर आयपीएलनंतर वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकाही खेळायची आहे. यानंतरच वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असायला पाहिजे की नाही, याबाबत चित्र स्पष्ट होईल. रोहितच्या नेतृत्वात संघाने काही खास कामगिरी नाही केली तर, आपण कर्णधारपदाबाबत वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो. एकदिवसीय विश्वचषकात रोहितने खास कामगिरी केली तर कदाचित २०२४ चा टी-२० विश्वचषकही त्याच्या नेतृत्वाखाली खेळवला जाऊ शकतो.’ असेही कार्तिकने स्पष्ट केले आहे.