मुंबई : शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे. केली आहे. रामदास कदम यांना अलीकडेच एक मेळावा घ्यायचा होता, पण त्याचा ‘मेलावा’ झाला, अशा शब्दांत भास्कर जाधवांनी खिल्ली उडवली. रामदास कदमांना ना बूड आहे, ना शेंडा आहे, अतिशय बेसलेस नेता म्हणजे रामदास कदम, अशा शब्दात भास्कर जाधवांनी सडकून टीका केली.
रत्नागिरीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिंदे गट आणि त्यांच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना रामदास कदमांच्या नुकत्याच पार पडलेल्या मेळाव्याचा उल्लेख करत भास्कर जाधव यांनी, “रामदास कदम हे मेळावा घेणार होते, पण त्याचा ‘मेलावा’ झाला. मेळाव्यासाठी पाच वाजताची वेळ देण्यात आली होती. शेवटी रामदास कदमांना कसंतरी आठ वाजता कार्यक्रमस्थळी यावं लागलं. लोकांनी रामदास कदमांना पूर्णपणे झिडकारलं, नाकारलं असून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली,” अशी टीकादेखील यावेळी त्यांनी केली.
पुढे बोलताना त्यांनी, “प्रसारमाध्यमांमध्ये बातमी यावी, म्हणून रामदास कदमांनी पुढचा आमदार शिंदे गटाचे बेटकर असतील, असं सांगितलं. विशेष म्हणजे, यापूर्वी दापोलीला जेव्हा आदित्य ठाकरे आले होते, त्यावेळी मी रामदास कदमांवर सडकून टीका केली. त्यानंतर रामदासभाईंनी ‘उत्तरसभा’ घेतली. त्या सभेच्या वेळी व्यासपीठावर भाजपा नेते केदार साठे बसले होते. तेव्हा रामदास कदम केदार साठेंना म्हणाले नातूंना निरोप द्या… पुढच्या वेळी मी तुम्हाला निवडून आणतो. आता या व्यासपीठावर काय म्हणाले? तर बेटकर तुम्हाला मी निवडून आणतो. खरं तर, रामदास कदमांना ना बूड आहे, ना शेंडा आहे… अतिशय बेसलेस नेता म्हणजे रामदास कदम…” अशा शब्दांत भास्कर जाधवांनी फटकेबाजी केली.
दरम्यान, भास्कर जाधव यांच्या टीकेला शिंदे गटाकडून कोणतेही उत्तर अजून तरी देण्यात आले नाही. मात्र रामदास कदम भास्कर जाधव यांच्या टीकेला काय उत्तर देणार हे पाहणे गरजेचे आहे.