मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ‘सुषमा अंधारे’ हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. शिवसेनेच्या नेत्या म्हणून त्यांनी आपल्या वकृत्वातून राजकीय नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. त्यांच्या भाषणांना मुळे शिवसेनेला एका नवीन चेहरा मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जाता आहे. मात्र सुषमा अंधारे यांनी केलेल्या एका वक्तव्याबद्दल वारकरी सांप्रदायाचे भावना दुखावल्या आहेत
दरम्यान, आपण केलेल्या या व्यक्तव्यावर काही दिवसांपूर्वी स्वतः सुषमा अंधारेंनी देखील प्रतिक्रिया देत माफी मागितली होती. “माझे जुने व्हिडीओ व्हायरल केले जातात, मग हे लोक मधले 10 ते 15 वर्ष हे कुठे गेले होते? आधी मी भाष्य केलं असलं तरीही त्यामागील लॉजिक समजून घेतलं पाहिजे. माझ्यासाठी माझा पक्ष महत्त्वाचा आहे. मात्र, माझ्या बोलण्याने वारकरी संत संप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागण्यात गैर वाटत नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या.
सुषमा अंधारे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही त्यांच्यावर हल्ला सुरूच आहे. त्यामुळे आता सुषमा अंधारे यांच्या समर्थनात थेट माजी पोलीस अधिकारीच आला आहे. “सुषमाताई तुमची मांडणी योग्य दिशेने चालली आहे. तुम्हाला ते धमकावून विचलित करण्याचा प्रयत्न करतील’. असा सल्लाच या पोलीस अधिकाऱ्याने दिला आहे. स्वतः सुषमा अंधारे यांनी या अधिकाऱ्याची पोस्ट आपल्या फेसबुकवर शेअर केली आहे. सुरेश खोपडे यांची ही पोस्ट अत्यंत ऊर्जादायी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट..!
सकाळी अंकूश काकडे काका यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे सर यांची ही अत्यंत ऊर्जादायी पोस्ट पाठवली
सुषमा अंधारे यांच्या जाळ्यात कोण कोण अडकले?
आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नाही असे जाहीर करून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि
मंडळींचे हिंदुत्व उघडे नागडे करून दाखविले. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले गेले. सुषमाताईंनी संयतपणे विरोधकांना प्रश्न विचारून राजकीय दृष्ट्या नामोहरण केले.
त्यांच्याकडे उत्तरे नाहीत. बचाव करता येत नाही म्हणून त्यांनी ज्याना जाणवे व शेंडीच्या पलीकडचा हिंदू धर्म माहीत नाही त्या तथाकथित वारकऱ्यांना पुढे केले. त्यात नकली वारकऱ्यांचा दर्जा दिसून आला. तात्पर्य एका महिलेने तीन-चार महिन्यात फेकलेल्या जाळ्यात एवढे मासे अडकले.
ती क्लिप दहा-बारा वर्षांपूर्वीची असताना ती पुन्हा दाखवली गेली व त्यावर तथाकथित वारकरी महिला व पुरुषांनी सुषमा अंधारे यांना वारकऱ्यांना न शोभणारी भाषा वापरली. एवढेच नव्हे तर हल्ला करण्याची फाडून टाकण्याची भाषा केली. हे सगळे देवेंद्र फडणवीस यांचे भाडोत्री सैनिक दिसतात. राजकारण्यावर शाई फेकली तर खुनाचा प्रयत्न यासारखे गुन्हे देवेंद्र फडणवीस दाखल करतात मग सुषमा अंधारे यांना दिल्या गेलेल्या धमक्याबाबत देवेंद्र अजूनही अभ्यासच करत आहेत काय? यात गृहमंत्री ही उघडे पडले. देवेंद्रजी कायद्याचा अभ्यास लवकर पूर्ण करा नाहीतर तुम्हाला जाब विचारण्यासाठी आम्ही येणार आहोत.
सुषमाताई तुमची मांडणी योग्य दिशेने चालू आहे. तुम्हाला ते धमकावून विचलित करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा. पक्ष असो अगर नसो. आम्ही तुमच्या बरोबर आहोत! अशा मांडणीतूनच समाज व्यवस्थेची रचना आधुनिकतेकडे व घटनेवरील आधारित मूल्यावर पुढे नेता येईल. सिव्हिल सोसायटी म्हणून ते आपणा सर्वांचे एक कर्तव्यच आहे. – सुरेश खोपडे”