मुंबई : दिशा सालियन मृत्युप्रकरणी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांकडून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर वारंवार आरोप होत असल्याचे दिसत आहे. याच आरोपांमुळे होत असलेल्या बदनामीबद्दल आदित्य ठाकरे न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिशा सालियन प्रकरणी तपास करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष चौकशी पथक स्थापन करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यासह काही नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन मृत्युप्रकरणी आरोप केले आहेत. त्यांच्या ‘नार्को’ चाचणीची मागणी केली आहे. शेवाळे यांनी रिया चक्रवर्तीला ‘एयू’ नावाने आलेले अनेक दूरध्वनी आदित्य ठाकरे यांचे होते, असे आरोप केले आहेत.
ठाकरे गटातील नेत्यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिले असले तरी अब्रुनुकसानीबद्दल न्यायालयात दावा दाखल करता येईल का किंवा ‘एसआयटी’ चौकशीसह अन्य मुद्दय़ांवर न्यायालयात जाता येईल का, याबाबत आदित्य ठाकरे कायदेशीर सल्ला घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
ठाकरे गटही आक्रमक झाला असून मुख्यमंत्री व राज्य सरकार विरोधात नागपूरमध्ये सोमवारी मोठा गौप्यस्फोट करण्याचे प्रत्युत्तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.