नवी दिल्ली – भारतात डिजिटायझेशन वाढत असल्यामुळे ई-कॉमर्स कंपन्याकडून खरेदी वाढत आहे. मात्र या कंपन्यांनी ग्राहकांच्या तक्रार निवारण्यासाठी तयार केलेली यंत्रणा मजबूत नाही. त्यामुळे ग्राहकांच्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनकडे येणाऱ्या तक्रारीत वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी दिली.
सिंह यांनी सांगितले की, नोव्हेंबर महिन्यात ई-कॉमर्स ग्राहकाच्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनकडे तब्बल 90 हजार तक्रारी आल्या. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये केवळ 40 हजार तक्रारी आल्या होत्या. यावरून ग्राहकांच्या तक्रारी कमी न होता वाढत असल्याचे दिसून येत आहे. या तक्रारी वाढू नये याकरिता ई-कॉमर्स कंपन्यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चार वर्षांपूर्वी एकूण तक्रारीमध्ये ई कॉमर्स संदर्भातील तक्रारी केवळ आठ टक्के होत्या. आता एकूण तक्रारीपैकी ई- कॉमर्स क्षेत्रातील तक्रारी 48% आहेत. यावरून परिस्थितीचा अंदाज येतो.
याचा अर्थ ई- कॉमर्स कंपन्यानी तक्रार निवारणासाठी तयार केलेली यंत्रणा पुरेशी काम करत नाही. तिचा विस्तार होण्याची गरज आहे. ग्राहक दुकानातून खरेदी करतो तेव्हा त्याला दुकानदाराकडे तक्रार करता येते. मात्र ई- कॉमर्स विरोधात तक्रार केल्यानंतर ग्राहकाचे परिस्थितीवर फारसे नियंत्रण राहत नाही. ग्राहकांची कुचंबना होते. त्यामुळे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या कामाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारतात शिक्षण क्षेत्र, वाहतूक, अन्न वितरण, ऑनलाइन गेमिंग इत्यादी क्षेत्रातील ग्राहकांची संख्या वाढत आहे. कशीही सेवा दिली तरी फरक पडत नाही अशी मानसिकता कमी होण्याची गरज आहे. या तक्रारी कंपन्यानी स्वतः सोडविल्यास तर आमची काही हरकत नाही. मात्र त्या तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन सध्या भारतात दहा भाषांतून उपलब्ध आहे. ती 22 भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. समाज माध्यमावर विविध वस्तूंची माहिती दिली जाते. ती अनेकदा चुकीची असते. याकडेही ग्राहक व्यवहार मंत्रालय लक्ष घालणार आहे.
ग्राहक मंचाकडील तक्रारी वाढल्या
जिल्हा व राज्य स्तरावरील ग्राहक मंचाकडे तब्बल 5.27 लाख तक्रारी आल्या आहेत. यातील 1.8 लाख तक्रारी विम्यासंदर्भातील आहेत. तर 80 लाख तक्रारी बॅंकिंग क्षेत्रासंदर्भातील आहेत. अनेकदा कंपन्याकडून किंवा जाहिरातदारांकडून चुकीच्या जाहिराती केल्या जात आहेत. या जाहिरातीना पायबंध घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सिंह यांनी सांगितले.