कुडाळ – राज्य मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने कुडाळ बाजारपेठेतील अतिक्रमणे शुक्रवारी काढण्यात आली. येथील व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करत स्वतःहून अतिक्रमण काढून घेतली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. येथील एसटी स्टॅन्डलगतचे व्यापारी गाळे काढण्यासाठी न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे संकट पुढील सुनावणीपर्यंत टळले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बाजारपेठेतील अतिक्रमणांबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. एका रहिवाशाच्या घरात जाण्यायेण्याचा रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाला होता. त्यामुळे संबंधिताने याबाबत राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली होती. त्यानुसार संबंधित विभागाला चौकशी करून ही अतिक्रमणे हटवून रस्ता खुला करण्याचे निर्देश मानवी हक्क आयोगाने दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करून अतिक्रमित बांधकामधारकांना नोटीसा बजावल्या होत्या. यामध्ये बस स्टॅन्डनजिक नव्यानेच बांधण्यात आलेल्या फळे, भाजीपाला कट्ट्यांचाही समावेश होता.
या व्यापाऱ्यांची उपजिविका या व्यवसायांवर असल्याने अतिक्रमण हटाव कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत परिस्थिती “जैसे थे” ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अन्य अतिक्रमण हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आपल्या टीमसह सकाळी नऊ वाजता कुडाळमध्ये दाखल झाले. यावेळी तहसीलदार राजेंद्र पोळ तसेच सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. प्रशासनाच्या कारवाईला व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.