– राजेंद्र काळभोर
लोणी काळभोर -सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची हवा तापली असल्याने मतदारांची मते आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवार मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने मोहित करण्यासाठी विविध प्रलोभने दाखवीत असली तरी चाणाक्ष मतदार ही प्रत्येक उमेदवाराला झुलवत ठेवून “साहेब, चिंता करू नका, तुमचीच हवा आहे, अहो आम्ही तर तुमचेच ना’ असा प्रत्येकाला दिलासा देत आहे. त्यामुळे मतदार गुलाल टाकणार की बुक्का देणार हे मंगळवारी (दि. 20) मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे.
कदमवाकवस्ती निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. निवडणूक म्हटली की श्रीमंत असो वा गरीब सर्वांचीच चंगळ असते. उमेदवारही कसलीच कुचराई न करता मतदान होईपर्यंत कार्यकर्ते व मतदारांचे लाड पुरविण्यात मग्न झाले आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर प्रभागांतील जनता, कार्यकर्ते यांना सांभाळून त्यांची मर्जी राखणे हे जिकीरीचे काम मोठ्या शिताफीने करावे लागते. त्यासाठी उमेदवाराच्या नाकीनऊ येते.
केवळ मताचे दान आपल्या पारड्यात पडावे म्हणून हे सारे सहन करून मतदारांना खूश करण्यासाठी वाटेल ते केले जात आहे. तेव्हाच कुठे मतदार आपली खरी ओळख देत आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी नेत्यांनी प्रभागासमवेत गावच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. सोशल मीडियामुळे निवडणूक व मतदानाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. उमेदवार मात्र अद्यापही कार्यकर्त्यांची जुळवा-जुळव करताना दिसत आहेत. निवडणुकीत होणारा खर्चही सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. अशा व इतर अनेक राजकीय चर्चेला सध्या उधाण आले आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या नाही तर मतदार आपल्याला मतदान करणार नाही.
आपण घराचा दरवाजा ठोठावला तर नाराजीला सामोरे जावे लागेल, मग ते आपल्याला मतदान करतील का ? अशा द्विधा मनस्थितीत प्रचारक व उमेदवार सापडले होते. सतत कुठल्या ना कुठल्या निवडणुका येत असतात. त्यामुळे नेमेची येतो दारी उमेदवार याप्रमाणे विचार करून आता मतदारराजाने आमचे मतदान तुम्हालाच पण वारंवार येवून त्रास देऊ नका असाच उपरोधिक टोला या गळ्यात पडणाऱ्या प्रचारकांना दिल्याचे दिसून आले. “भावनाओं को समझो’ म्हणत निदान दुपारच्या प्रहरी तरी वामकुक्षी घेऊ द्या, काही वेळ उसंत घेऊ द्या असे मतदार म्हणत होते.
रिमोट कंट्रोल हातात ठेवण्यासाठी…
ग्रामीण भागात सध्या विविध शेतीकामे सुरू आहेत. त्यामुळे सकाळी व रात्री कार्यकर्ते गल्लीबोळातून, घरोघरी फिरुन निवडणुकीनंतर आम्ही काय करणार आहोत ? याचा शेवटच्या क्षणापर्यंत पाढा वाचत होते. . गावातील मुख्य रस्ते, चौक, चावड्या गजबजल्या असून हॉटेलवर चहापाणी मागवले जात आहे. या निवडणुकीत जिल्हा व तालुका स्तरावरील अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काहीजण स्वतः रिंगणात नसले तरी रिमोट कंट्रोल हातात ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
गाव विकासाच्या गप्पांना ऊत
उमेदवार आम्हीच कसा गावाचा थांबलेला विकास करू शकतो पटवून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. या निवडणुकीत काही जुन्यांसह नवीन चेहरे रिंगणात उतरले आहेत. तरुणांमध्ये निवडणूकी संदर्भात उत्साह आहे. सध्या गावासाठी पिण्याचे पाणी, रस्ते, वीज आदी विषय निवडणुकीत ऐरणीवर आले असून गावविकासाच्या गप्पांना वेग आला आहे.
पॅनल गेला उडत
चिन्ह वाटपानंतर प्रचाराला सुरवात झाली असून पॅनल टू पॅनल मतदान करण्याचे आवाहन केले जात होते. काही ठिकाणी (सिंगल फुली) म्हणजेच मला एकट्यालाच मतदान करा, पॅनेल गेला उडत, असाही प्रचार गुपचूप सुरू आहे. जवळपास सर्वच ठिकाणी दुरंगी सामना होत असल्याने उत्सुकता वाढली आहे. मतदारांना कोण उमेदवार कोणत्या पॅनलमधून उभा आहे ? याची खात्री करुन घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे.