पारगाव -भीमानदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे तेथील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला त्यांचे ढापे काढले जातात व दिवाळीनंतर लगेच टाकले जातात. या वर्षी पावसाळा अधिक दिवस राहिल्याने ढापे टाकण्यास ही उशीर झाला आहे;
परंतु या बंधाऱ्यावरील असणारा पारगाव बंधारा ढापे टाकून अडविण्यात आला असून हातवळण बंधारा न अडविल्यामुळे पारगाव बंधाऱ्यातून येणारे नदी पत्रातील पाणी बंद झाले असल्याने ऐन थंडीच्या दिवसात शेतकऱ्यांना घाम फुटला आहे.
विद्युत पंपाचे फूटबॉल उघडे पडले आहेत. खरे तर हातवळण बंधारा अडविल्यानंतर पारगाव बंधारा अडविला जातो; परंतु तसे झाले नसल्याने नक्की हलगर्जीपणा कोणाचा? याबाबत पाटस पाटबंधारे विभागाचे अधिकारी राहुल वऱ्हाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.