फुरसुंगी – पुणे महानगरपालिकेतून फुरसुंगी आणि उरूळीदेवाची ही दोन गावे वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतल्यानंतर या भागातील महापालिका निवडणुकीचे गणितेच बदलली आहेत. सुरवातीला आरक्षण, प्रभाग रचना जाहीर होत नसल्याने आजी-माजी नगरसेवकांसह “इच्छुक’ उमेदवारांना तयारी करण्यात अडचणी येत होत्या. आता, ही दोन गावेच वगळण्यात येत असल्याने संपूर्ण राजकारणाच बदलणार आहे. नव्या नगरपालिकेसंदर्भातील प्रशासकीय निर्णयांवरच येथील जुन्या-जाणत्यांचे राजकारण अवलंबून असणार आहे. त्यातच “प्रथम नगरसेवक’ म्हणून येणाऱ्यांचे स्वप्नही या नवी नगरपालिकेच्या निर्णयामुळे धुळीस मिळणार आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मुख्य राजकीय पक्षांसह छोट्या-मोठ्या पक्षांसह अपक्षांनीही तयारी केलेली असताना निवडणूक प्रक्रिया आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या निर्णयातच अडकली होती. मात्र, निवडणूक लढवायचीच, यावर ठाम असलेल्यांनी आजी-माजींसह “इच्छूक’ उमेदवारांनीही पक्षीय वरीष्ठांकडे पाठपुरावा सुरू केला होता. अनेकांनी गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत तयारी करीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी फराळ, स्नेहमेळावा असे विविध कार्यक्रम घेतले. परंतु, गेल्या महिन्यांपासून निवडणुकीच्या तारखा पुढे जात आहेत तर प्रभागांबाबतही निर्णय होत नसल्याने उमेदवार वैतागले आहेत, अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून फुरसुंगी आणि उरूळीदेवाची गावे पालिकेतून वगळण्याचा तसेच या गावांची नवी नगरपालिका तयार करण्याची घोषणा करण्यात आल्याने “इच्छूक’ उमेदवारांच्या “तयारी’ला मोठा “खो’ बसला आहे. आता, याबाबतची शासकीय प्रक्रिया, निर्णय आदींबाबत पुढील सर्व प्रक्रिया अवलंबून आहे. यातून राजकीय पक्षांसह अनेक “इच्छुक’ आता आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवू लागले आहेत.
तयारी जाणार वाया?
फुरसुंगी आणि उरुळीदेवाची ही गावे शेजारी-शेजारी असल्याने व सर्वच पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांना चांगलेच परिचित असताना त्यांची जवळची नातीगोतीही आहेत. त्यामुळे प्रत्येक “इच्छुक’ आपल्या मतांची गोळाबेरीज करीत नगरसेवक होण्यासाठी निवडणुकीचे गणिते आखत होते. तुल्यबळ, जनमत असणारा व विकासाची दृष्टी असणारा आणि धनदांडगा उमेदवाराच राजकीय पक्षांकडून तिकीटीही फायनल झाले होते. परंतु, ही दोन्ही गावे पालिकेतून वगळण्यात आल्याने सर्वच तयारी वाया जाणार की काय? अशी चर्चा आहे.