संभाजीनगर (जितेंद्र गवळी) – पिंपरी-चिखली मार्गावर शाहूनगर येथे गुरुवारी (दि.24) सकाळी आईसोबत दुचाकीवरून शाळेत जात असलेल्या एका विद्यार्थ्याचा मालवाहू ट्रकच्या धडकेने जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली. सकाळच्या वेळी हा अपघात झाल्याने रस्त्यावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. सध्या या चौकात अपघात रोखण्यासाठी उपयोजना करण्यात येत आहेत. परंतु हे सर्व करण्यासाठी एका मुलाचा बळी जाण्याची वाट प्रशासन पाहत होते का? आणि आता तरी कायमस्वरूपी उपाययोजना होणार का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
या दुर्दैवी अपघातामुळे हा चौक आणि येथील वाहतूक व्यवस्था हा विषय चर्चेत आला आहे. या चौकात वाहतुकीतील बेशिस्तपणा, अवैध पार्किंग, अतिक्रमण, अनेक खड्डे आणि या सगळ्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि छोटेमोठे अपघात या बाबी नित्याच्याच असल्याची प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली.
हा अपघात झाल्यानंतर राजकीय पदाधिकारी आणि नागरिकांच्या संतपानंतर अपघाताच्या ठिकाणी ट्राफिक कंट्रोलच्या अधिकाऱ्यांनी व पालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यापुढे अपघात होणार नाही यासाठी काय उपाययोजना करता येईल याची पाहणी त्यांनी केली.
वस्तुस्थिती पाहता हा चौक म्हणजे एक अपघातप्रवण क्षेत्र म्हणता येईल इतके अपघात या ठिकाणी वारंवार होत असतात. मागील काही वर्षांमध्ये या ठिकाणी 5 ते 6 अपघातामध्ये जीवितहानी झाली आहे. याशिवाय छोटेमोठे अपघात तर सातत्यानेच होतात. असे असताना प्रशासन यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी तात्पुरती मलमपट्टी करत आहे.
वाहतूक पोलिसांचा हलगर्जीपणा?
शाहूनगर चौकाच्या आजूबाजूला नेहमीच गर्दी असते. बऱ्याच वेळा ट्राफिक जाम होते. नागरिक वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. याठिकाणी कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात नाही. त्यामुळे नेहमीच ट्राफिक जामची समस्या होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याविषयी निगडी वाहतूक विभागाच्या निरीक्षक विजया कारंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सदर ठिकाणी नियमित वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करण्यास मर्यादा येत असल्याचे सांगितले. परंतु नुकतीच सदर ठिकाणी पाहणी केली असून इथून पुढे कर्मचारी तैनात करून वाहतूक सुरळीत राहील यासाठी उपाययोजना करणार असल्याचे सांगितले.
पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
भीषण अपघातामुळे शेजारील अभिषेक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पालकांनी मुलांना एकट्याने किंवा सायकलवर पाठविण्यास असुरक्षित वाटत असल्याचे सांगितले. पालिका प्रशासन आणि वाहतूक व्यवस्था यांनी अपघात टाळण्यासाठीच्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविल्यास अन् नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघातांची संख्या निश्चितपणे कमी होईल आणि वाहतूक व्यवस्था देखील सुरळीत चालेल, अशी अपेक्षा मुलांच्या पालकांनी व्यक्त केली.