आधुनिक काळातील महिपती असे ज्यांना संबोधले जाते असे संतकवी दासगणू महाराज यांचे आज तिथी प्रमाणे पुण्यस्मरण. त्यांचे मूळ नाव गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे. त्यांचा जन्म अकोळनेर, ता. जि. अहमदनगर येथे झाला. त्यांनी केलेल्या संत चरित्रलेखनामुळे त्यांना “आधुनिक महाराष्ट्राचे महीपती’ म्हणून ओळखतले जाते.
वर्ष 1893 मध्ये ते पोलीस खात्यात भरती झाले आणि 1904 पर्यंत नोकरी केली. पोलीसखात्यात नोकरीला असलेल्या सहस्रबुद्धे ऊर्फ दासगणू महाराज यांचा ओढा मात्र परमार्थाकडेच होता. नोकरीत असताना त्यांना त्यावेळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून सहीसलामत सुटले. तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली की देवानेच आपल्याला वाचविले.
मग त्यांनी संपूर्ण जीवन अध्यात्माला अर्पण केले. त्याकाळी तमाशा हे करमणुकीचे साधन होते. त्यांनी तमाशासाठीही काव्यरचना केली. एकदा श्रीगोंद्याला दासगणूंची सद्गुरू वामनशास्त्री इस्लामपूरकर यांच्याशी भेट झाली. शास्त्रीबुवांनी मंत्रोपदेश देण्याचा आग्रह दासगणूंनी धरला. शास्त्रीबुवांनीही त्यांना शिवमंत्राचा उपदेश केला. तसेच पंढरपूरची वारी करण्यास सांगितले. त्यानंतर सद्गुरूंचा दास असा गणू या भावनेने ते काव्यरचनेत स्वतःचा उल्लेख “दासगणू’ असा करू लागले. त्यांचे पहिले कीर्तन वर्ष 1897 मधे जामखेडच्या विठ्ठल मंदिरात झाले व कीर्तनकार म्हणून आध्यत्मिक क्षेत्रात त्यांचे नाव झाले. त्यांनी पहिले नारदीय कीर्तन 1906 मध्ये श्री साईबाबांचे सांगण्यावरून केले.
“श्री साईनाथ स्तवनमंजिरी’ या स्तोत्राची रचना त्यांनी 9 सप्टेंबर 1918 रोजी मध्य प्रदेशातील श्री माहेश्वर या क्षेत्री श्री साईबाबांचे महानिर्वाणाच्या अगोदर 37 दिवसांपूर्वी केली. त्यानंतर साईबाबा संस्थानचे पहिले अध्यक्ष म्हणून दासगणू महारांजाची निवड झाली. श्री साईबाबा यांचे मानसपुत्र म्हणून त्याना ओळखले जाऊ लागले. तेथून पुढे 1945 पर्यंत त्यांनी अध्यक्षपद सांभाळले. गजानन महाराज शेगाव यांचे चरित्र त्यांनी अत्यंत भक्तिभावपूर्ण रसाळ असे ओवीबद्ध केले. आज घरोघरी त्याची पारायणे होतात. संतकवी दासगणू यांनी सुमारे संतचरित्राचे 25पेक्षा अधिक ग्रंथ लिहिले.
अमृतानुभव भावार्थमंजिरी, उपदेशपर पद्ये, उद्धवागमन, छात्रबोध, हितबोध, पासष्टीभावार्थदीपिका, श्रीगजाननविजय- शेगावच्या श्रीगजानन महाराजांच्या लीलाचरित्र वर्णन असलेला ग्रंथ. श्री पांगारकर यांनी पद्यरूपात चरित्र लेखनासाठीसाठी श्री गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ ह. भ. प. संतकवी श्री दासगणू यांचे नाव सुचवले, त्यावेळी ते पंढरपूर येथे होते. शेगावहून संस्थानची मंडळीं दासगणूंना भेटण्यास आली व त्यांना श्री गजानन महाराजांचे चरित्र पद्य ओवीबद्ध रूपात लिहिण्याची विनंती केली. दासगणूंनी शेगाव येथे यापूर्वीच गजानन महाराजांचे दर्शन घेतले असल्याने त्यांनी होकार दिला.
श्री रतनसा सोनावणे यांनी दिलेली कागदपत्रे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणी कालक्रमानुसार संकलित केल्या. छगन बारटक्के दासगणू महाराजांना प्रसंग वाचून दाखवत आणि दासगणू महाराज तात्काळ तो प्रसंग ओवीबद्ध करत आणि लेखनिक भराभर लिहून घेत. त्या लेखनाचे जाहीर वाचन होई. तेव्हा ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होई. दासगणू महाराजांनी 21 अध्यायांचा, 3669 ओव्यांचा रसाळ आणि प्रासादिक ग्रंथ संस्थानाकडे सुपूर्त केला.