नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाच्या माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. अन्न सुरक्षा कायदा अर्थात एनएफएसए कसा फायदेशीर आहे या संदर्भात मोदी सरकारने अलिकडेच सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. मात्र याच मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना या अन्न सुरक्षा योजनेची खिल्ली उडवली होती. त्यामुळेच आता मोदींचा जुना व्हिडिओ शेअर करत जयराम रमेश यांनी त्यांना लक्ष्य केले आहे.
मोदी केवळ खोटेच बोलत नाहीत तर ते घुमजाव (यू टर्न) घेण्यातही वस्ताद आहेत. अगोदर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा किती निरर्थक आहे हे सांगताना ते थकत नव्हते. मात्र आता तेच मोदी सर्वोच्च न्यायालयाला या कायद्याचे फायदे सांगत आहेत. या कायद्यामुळे गरिबांची भूकेची समस्या वाढणारच आहे असे त्यांचे म्हणणे होते. गरीबी रेषेच्या खाली जगणाऱ्यांच्या तोंडातील घासही या योजनेमुळे िंहरावून घेतला जाणार असल्याचा दावा मोदी संबंधित व्हिडिओत करताना दिसत आहेत. मात्र त्याच योजनेवरून आता त्यांनी यू टर्न घेतला असल्याकडे रमेश यांनी लक्ष वेधले.
मनमोहन सिंग यांच्या सरकारने 2013 मध्ये ही योजना सुरू केली होती. त्यावेळी त्या विधेयकाला देशातील केवळ एका मुख्यमंत्र्यांनी विरोध केला होता व ते होते नरेंद्र मोदी. याकडे लक्ष वेधून जयराम रमेश म्हणाले की मोदी मनरेगाचीही खिल्ली उडवायचे. मात्र नंतर त्यांना ही योजना आवडायला लागली.
Nagpur : अंभोरा पर्यटन केंद्रासाठी 200 कोटी देणार – देवेंद्र फडणवीस
सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार ग्रामीण भागातील 76 टक्के तर शहरी भागातील 50 टक्के नागरिकांना सवलतीच्या दरात अन्न उपलब्ध करून दिले जाते. ही योजना सुरू झाल्यानंतर 4.7 कोटी रेशन कार्ड या याजनेच्या अंतर्गत जोडली गेली असल्याची माहिती केंद्र सरकारनेच न्यायालयात दिली आहे.