नांदेड – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत गुरूवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सहभागी झाले. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्या यात्रेत सहभागी होणार नसल्याचेही स्पष्ट झाले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि नेते जितेंद्र आव्हाड यात्रेत सहभागी झाले. आता उद्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होतील. त्या घडामोडींमधून शिवसेनेचा ठाकरे गट, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील मैत्री घट्ट असल्याचे सूचित झाले. दरम्यान, पवार यात्रेत सहभागी होणार नसल्याची माहिती कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने मी एका अत्यंत ऐतिहासिक क्षणाचा आज साक्षीदार झालो. कॉंग्रेसचे नेते मा. खा. @RahulGandhi जी यांनी सुरू केलेल्या या यात्रेस मी @NCPspeaks पक्ष आणि आमचे नेते आदरणीय खा. @PawarSpeaks साहेब यांच्यावतीने पाठिंबा देतो. @INCIndia@INCMaharashtra pic.twitter.com/9lTltpAsjR
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 10, 2022
पवार यांनी याआधी यात्रेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली होती. पण, प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे, असे त्यांनी नमूद केले. काही दिवसांपूर्वी पवार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी राहुल यांनी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्याचेही रमेश यांनी सांगितले.