मुंबई : राज्यातील सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ बडोद्यात होणार असून २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे आणखी एक राज्यातील प्रकल्प गुजरातला गेला आहे. यावरून राज्य सरकारवर विरोधकांकडून निशाणा साधण्यात येत आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारवर सडकून टीका केली आहे. “खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला. खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.
अशातच एअरबसच्या आरोपांवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलतांना ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिले आहे. एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय हा वर्षभरापूर्वीच कंपनीने घेतला होता, असा खुलासा उदय सामंत यांनी केला आहे.
सामंत म्हणाले,’युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलेले आरोप मी समजू शकतो. कारण विरोधक म्हणून हे आरोप आम्हाला देखील अपेक्षित आहेत. पण त्या आरोपांमुळे युवा पिढीत संभ्रम निर्माण करु नये, अशी माझी विनंती आहे. कारण या प्रकल्पाबाबत मी एका मुलाखतीत नक्कीच उल्लेख केला होता की हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करु. पण त्यानंतर माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की 21 सप्टेंबर 2021 रोजीच या प्रक्लपाचा एमओयू झालेला होता. म्हणजेच वर्षभरापूर्वीच हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही हे निश्चित झालेलं होतं. याची कागदपत्रेही आपल्याला बघायला मिळतील.
ते पुढे म्हणाले, ‘आपल्या युवा पिढीचं दुर्देवं असं आहे की, एक वर्षापूर्वी एमओयू झाला, पण तो प्रकल्प आमच्याकडे यावा यासाठी साधं एक पत्रही गेल्या सरकारकडून केंद्र सरकारकडे गेलं नाही, अशी माझ्याकडे प्राथमिक माहिती आहे.’