गुजरातमध्ये मोदींशी सर्वसामान्य जनतेचे भावबंध जोडले गेले आहेत आणि त्याचा पुरेपूर लाभ उठवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.
2017 सालच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच प्रचारात भाजपचा चेहरा होते. गुजरातच्या विकास प्रारूपामुळेच 2014 मध्ये मोदी पंतप्रधानपदापर्यंत धडक मारू शकले. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी हे गुजरातच्या राजकारणातून बाहेर पडले, तसेच अमित शहादेखील. अशावेळी गुजरातमध्ये जनमानसावर पकड असणारा जननेता भाजपकडे नव्हता. त्यात पटेल आरक्षण आंदोलन झाले होते आणि त्यानंतर उना येथे दलितांना मारहाण झाली होती. अपुऱ्या पावसामुळे गुजरातमध्ये शेतीची पार दुरवस्था झाली होती. शिवाय 22 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपविरोधात प्रस्थापितविरोधी लाट येण्याची शक्यता होती.
गेल्या पाच वर्षांत गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलावे लागले आणि आता भूपेन पटेल हे मुख्यमंत्री आहेत. परंतु त्यांच्या नावावर मते मिळण्याची शक्यता नसल्यामुळेच यावेळीही मोदींच्याच नावावर मते मागावी लागणार आहेत. मोदी मुख्यमंत्री असताना भाजपला 2002, 2007 व 2012 मध्ये सत्ता मिळाली होती. गेल्यावेळी कॉंग्रेसने जबरदस्त आव्हान निर्माण केले होते. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसने पायात पाय घालून कॉंग्रेसचे नुकसान केले. भारतीय जनता पक्षाने नुकतीच गुजरातमध्ये 5700 किलोमीटर क्षेत्र आणि 144 विधानसभा मतदारसंघ पादाक्रांत करणारी गौरवयात्रा काढली होती. गुजरातचे भूमिपुत्र मोदी यांनी भारताचे नाव जगात दुमदुमत ठेवले असून, “भरोसा नी भाजप सरकार’ असे या यात्रेचे प्रचारसूत्र होते.
गेल्या 27 वर्षांत भाजपने गुजराती अस्मिता निर्माण केली आणि मोदी यांच्या गव्हर्नन्स मॉडेलनुसार वाटचाल केली. सरदार सरोवर प्रकल्प, स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि 370वे कलम रद्द करणे, हे मुद्दे गौरवयात्रेत लोकांना वारंवार सांगण्यात आले. गुजरातमध्ये एकूण लोकसंख्येच्या 15 टक्के म्हणजे 89 लाख आदिवासी मतदार आहेत. ही यात्रा आदिवासी बहुल भागातूनही गेली. 1985 साली कॉंग्रेसचे नेते माधवसिंह सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली त्या पक्षाला 182 पैकी 149 जागा मिळाल्या होत्या. हा विक्रम तोडण्याचा निश्चय भाजपने केला आहे. परंतु यावेळी भाजपला कॉंग्रेसबरोबरच आम आदमी पक्षाचे (आप) आव्हान आहे. शिवाय तीन दशकांच्या सलग राजवटीमुळे काही प्रमाणात जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. तो काबूत ठेवणे भाजपला जरूरीचे असेल.
2017 साली भाजपला केवळ 99 जागा मिळाल्या होत्या आणि कशीबशी सत्ता राखता आली होती. याचे कारण, हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली पाटीदारांचे जे आंदोलन झाले, त्याचा फायदा कॉंग्रेसने उठवला. आता हार्दिक अलगदपणे भाजपमध्ये जाऊन बसले आहेत. शिवाय राज्यात तशी कोणतीही आंदोलने सुरू नाहीत. 2017 साली भाजपला 49 टक्के मते मिळाली, तर कॉंग्रेसला 41 टक्के. कॉंग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. भाजपची गौरवयात्रा समाप्त झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील हे गांधीनगरला आले. द्वारका ते पोरबंदर या टप्प्यात ते यात्रेत सामील झाले होते आणि मिळालेल्या प्रतिसादामुळे त्यांना आनंदही झाला होता. या यात्रेत 40 लाखांपेक्षा अधिक लोकांशी संवाद साधता आला, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र भाजपचा राज्यातील तसेच केंद्रामधील कारभार जनतेने पाहिला असल्यामुळे आमच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
संपूर्ण यात्रेत गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा फारसा उल्लेख झाला नाही. उलट सर्वत्र मोदींच्याच नावाचा गजर सुरू होता. तसेच आप जेवढी आरडाओरड आणि प्रचार करत आहे, तेवढी मते त्यांना बिलकुल मिळणार नाहीत, असा आत्मविश्वास भाजप कार्यकर्त्यांना वाटत आहे.
2002 मध्ये गुजरातेत दंगली झाल्या आणि त्यानंतर मोदी यांनी तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे इटालियन मूळ काढून जोरदार टीका केली होती. 2007 साली “मौत का सौदागर’, या सोनियाजींच्या वक्तव्याचा मोदींनी खरपूस समाचार घेतला होता आणि पाकिस्तान वगैरे विषय काढून धार्मिक ध्रुवीकरण साध्य केले होते. यावेळी मात्र कॉंग्रेसवर हल्ला चढवून फारसा उपयोग नाही, त्यापेक्षा आप ला लक्ष्य ठेवणे फायद्याचे आहे, असे भाजपला वाटत आहे. गुजरातमध्ये मोदींशी सर्वसामान्य जनतेचे भावबंध जोडले गेले आहेत आणि त्याचा पुरेपूर लाभ उठवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.
2002, 2007, 2012 आणि 2017 अशा चारही वेळा विधानसभा निवडणुकींच्या आधी भाजपने गौरवयात्रा काढल्या होत्या. गेल्यावेळी यात्रेचे दोनच मार्ग होते. तर यावेळी ते चार आहेत. रोजच्या रोज 15 जाहीर सभा घेतल्या जात होत्या. अशा एकूण दीडशे सभा झाल्या आणि त्यात केंद्रीय व राज्यातील मंत्र्यांनी जनतेला संबोधित केले. मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा गौरवयात्रेत प्रथमपासून शेवटपर्यंत ते सहभागी झाले होते. परंतु यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे यात्रेत काही ठिकाणीच सामील झाले. पटेल असो की विजय रूपाणी वा आनंदीबेन पटेल, या माजी मुख्यमंत्र्यांचा यात्रेत फारसा उल्लेख झालाच नाही. आनंदीबेन या आता उत्तर प्रदेशच्या राज्यपाल असून, त्या सक्रिय राजकारणात नाहीत. गुजरातेत हिंदुत्वापेक्षा मोदीत्वावर अधिक भर दिला जातो. मोदींनी गुजरातचा विलक्षण गतीने विकास साधला, हे अधोरेखित केले जात असून, वेदांत फॉक्सकॉन सेमिकंडक्टर प्रकल्प आणि दाहोद येथील 22 हजार कोटी रुपयांच्या प्रस्थापित प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होणार आहे, हा मुद्दा प्रचारात ठासून सांगितला जात आहे.
संपूर्ण प्रचारात, मोदींनी भारताला एका विलक्षण उंचीवर नेऊन ठेवले आहे, हे वारंवार सांगितले जात आहे. गेल्या पाच वर्षांत कॉंग्रेसने गुजरातकडे दुर्लक्ष केल्याचा फायदाही भाजप व आप ला होत असून, यावेळी गुजरातमध्ये पुन्हा एकदा मोदीलाट दिसण्याचीच चिन्हे आहेत.