भुवनेश्वर – ओडिशा आणि पश्चिम बंगालला पुढील आठवड्याच्या सुरुवातीला चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आल्याने या दोन्ही राज्यांनी त्या विषयीची दक्षतेची उपाययोजना सुरू केली आहे. या वादळाबरोबरच या दोन्ही राज्यांत पावसाचीही शक्यता आहे. हे चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि बांगलादेशकडे सरकण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने अनेक जिल्ह्यांतील सखल भागातील लोकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तर अंदमान समुद्र आणि लगतच्या भागात सध्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या रूपात असलेली हवामान प्रणाली, सोमवारी चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. थायलंडने सुचविल्याप्रमाणे या चक्रीवादळाचे नाव सितरंग असे अपेक्षित आहे.
ओडिशाच्या महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री प्रमिला मल्लिक यांनी सांगितले की, आमच्या राज्यातील सर्व जिल्हे आणि किनारी प्रदेश प्राधिकरणांना कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मल्लिक म्हणाल्या की, अग्निशमन सेवा विभाग, एनडीआरएफ कर्मचारी आणि अन्य यंत्रणा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहेत.
दरम्यान, चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने पूर्व मेदिनीपूर, दक्षिण 24 परगणा आणि सुंदरबनमधील सखल भागातील लोकांना सुरक्षित आश्रयस्थानी हलवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तयारीचा भाग म्हणून सर्व जिल्हा दंडाधिकारी, एसपी आणि आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या जिल्ह्यांमध्ये तारापोलीन, कोरडे अन्न आणि औषधांचाही पुरेसा साठा करण्यात आला आहे. कोलकाता पोलिसांच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला कोलकाता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी राज्य सचिवालयात तातडीची बैठकही बोलावली होती.