हिंगोली – जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गारखेडा या अतिवृष्टीग्रस्त गावातील सर्वजणांनी मिळून एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सध्या प्रशासनाची चांगलीच झोप उडाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून व या पत्रात आपल्या वेदना मांडत गावातील सर्व नागरिकांनी मिळून अख्खा गाव विक्रीला काढला आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गावकऱ्यांनी लिहिलं आहे की, ग्रामस्थांच्या वतीने आपणास विनंतीपूर्व अर्ज सादर करण्यात येतो की, तीन वर्षापासून संपूर्ण परिसर अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त झाला आहे. यामध्ये सरकारने पिक विमा दिला नाही. अतिवृष्टीची मदत अजून मिळाली नाही. आज सणासुदीचा काळ असून सुद्धा आमची संपूर्ण गाव हे अंधारात आहे. त्याचबरोबर आम्हाला प्रत्येक सण हा काळोखा साजरा करावा लागतो आहे. तसेच खाजगी फायनान्स कंपन्यांनी आम्हाला तगादा लावला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. हिंगोली जिल्हा आत्महत्याग्रस्त घोषित करण्यात यावा, यांसह आदी मागणीसाठी आम्ही सर्व ग्रामस्थ सर्वानुमते निर्णय घेतो की, आमचे गाव, आमची गुरे, ढोरे, शेत जमीन विक्री आहे. तरी सरकारने दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्या ही विनंती.
गारखेडा गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रातून मुख्यमंत्र्याकडे वेदना मांडली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही, अनेक आंदोलन झाली, आश्वासने देऊनही मदतीचा लाभ न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. त्याचबरोबर पिक विमा कंपन्या सुद्धा उटावून शेळ्या राखत असल्यामुळे पिक विमा पासून शेतकरी वंचित राहत आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी, अशी सध्या जिल्ह्यातील शेकतकऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे.