पुणे – डमी आडत्याने व्हॉट्सअपर बिल देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार ताजा असतानाच मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात आणखी एक फसवणूकीचा प्रकार उघडकीस आला आहे. नवरात्रोत्सव काळात या विभागातील आडतदाराने शेतकऱ्यांकडून भराई व तोलाई वसूल केल्याचा केली आहे. मूळात भाजीपाला विभागात फुलांच्या व्यवहाराची परवानगी नसताना हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आता तर शेतकऱ्याची लुट थांबणार का, बाजार समिती प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सातारा जिल्ह्यातून एक शेतकरी 4 ऑक्टोबर रोजी मार्केट यार्डात 724 किलो फुले विकण्यासाठी आला. यावेळी, त्या शेतकऱ्याने अडत्याकडे 724 किलो झेंडूचा व्यवहार केला. फुल खरेदीनंतर अडत्याने गाडीमधील काही क्रेट खाली केले. त्यानंतर, पावती करताना त्याने त्यामध्ये विशिष्ट हमालीची रक्कम नमूद केली. तसेच, भराई व तोलाईचे पैसे त्याच्या पैशातून वजा करत शिल्लक रक्कम शेतकऱ्याकडे सूपूर्त केली.
“फुलमहोत्सवात फुलांची विक्री केली असती तर शेतकऱ्यांकडून कोणताही अतिरिक्त खर्च घेतला नसता. मात्र, शेतकऱ्याने भाजीपाला विभागातील ओळखीच्या अडतदाराकडे फुलांचा व्यवहार केला. त्यामुळे भराई व तोलाई वसुल करण्यात आली. मात्र, या प्रकरणाची माहिती घेऊन भाजीपाला विभागातील अडत्यांनी केवळ भाजींचीच विक्री करावी याबाबत समज देण्यात येईल.
– मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.
एरवी फुलबाजारात शेतकऱ्यांच्या पट्टीतून हमाली व तीन टक्के अनुषांगिक खर्च वजा करत शिल्लक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येते. मात्र, सणासुदीच्या काळात चार पैसे मिळतील या अपेक्षेने फुले घेऊन आलेल्या शेतकऱ्यावर तरकारी विभागातील अडतदाराने अनावश्यक तोलाई व भराईचा बोजा टाकत लुट केल्याने बाजार समिती प्रशासन खरोखरच शेतकऱ्यांच्या विचार करते का असा प्रश्न उपस्थित होतो.