संगमनेर – केंद्र सरकारवर टीका करण्यापलीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे काय शिल्लक आहे. त्यांनी जनाधार आणि सरकार गमावलं. त्यांनी आता स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शिल्लक राहिलेलं संघटन कसं टिकवता येईल यांच्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.
त्यांना चुकीचे प्रवक्ते लाभले होते, ते बेताल विधान करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने त्यांचा फार मोठा विजय आहे तर उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने हा त्यांचा नैतिक पराभव असल्याची, टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
विखे म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवावर टीका केली. सार्वजनिक जीवनामध्ये व्यक्तिगत पातळीवर टीका न करणे हे प्रत्येक पुढाऱ्याने सांभाळले पाहिजे. लोकसभेला सुजय विखे उभे होते, त्यावेळी राज्याचे जेष्ठ नेत्याने कुटुंबा कुटुंबात शिवराळ भाष्य करायला लावली होती आणि तेच उद्धव ठाकरे यांचे सल्लागार आहेत.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा धरू शकतो, असा टोला राष्ट्रवादी चे नेते शरद पवार यांना लगावला. ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्या नातवाबद्दल असं बोलणं योग्य नाही त्यांनी शिंदे कुटुंबाची माफी मागितली पाहिजे, असेही विखे म्हणाले.