संगमनेर – तालुक्यातील खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांचा विजवाहक तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. आज 12 वाजेपर्यंत कुटुंबाने ते मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. परंतु पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मध्यस्थी करत प्रत्येकी 11 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी 5 लाख, महा वितरण कंपनी कडून सानुग्रह अनुदान 4 लाख रुपये आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या योजनेतून 2 लाख असे 11 लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी विखे म्हणाले, चार निरपराध बालकांचा मृत्यू झाला ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. वितरण कंपनीच्या निष्काळजीपणाचा हा प्रकार आहे. लाईनमन गावात थांबत नसल्याची तक्रार अनेक गावांची आहे. येथेही वीज प्रवाह चालू राहिला त्यामुळे निष्पाप मुलांचा जीव गेला. त्यामुळे घारगाव विभागातील सहाय्यक अभियंता आणि वायरमन यांना तात्काळ निलंबनाचा आदेश देण्यात आले आहे आणि मृतांच्या कुटुंबियांना 11 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे अनिकेत अरूण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजितबर्डे, विराज अजित बर्डे या चारही निष्पाप मुलांना आपला जीव गमवावा लागला. चौघे मुले खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेले होते. त्याच दरम्यान विजवाहक तारेचा शॉक लागून या चारीही लहाण मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.