मुंबई – करोना महामारीनंतर दोन वर्षांनी देशभरासह राज्यातही नवरात्री महोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, गरबा खेळत असताना हृदयविकाराचे धक्के येत असल्याचे प्रकार घडत आले. यात देशात सहा जणांचा मृत्यू झाल्याने उत्साहाला गालबोट लागल्याचे दिसून येत आहे. यामध्ये राज्यातील चार जणांचा समावेश असून मुंबईत दोघांचा मृत्यू झाला आहे.
नवरात्रीमध्ये तरुणाईचा उत्साह एकीकडे ओसांडून वाहत असताना दुसरीकडे मात्र या हृदयविकारामुळे मृत्यूच्या घटना घडत आहेत. गुजरातमधील आनंद परिसरातील तारापूर या ठिकाणच्या 21 वर्षाच्या युवकाचा गरबा खेळताना मृत्यू झाला. गरबा खेळताना हा युवक अचानक बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
वाशिमधील कारंजा गावात गरबा खेळताना दोन दिवसात दोघांचा मृत्यू झाला आहे. 30 सप्टेंबर रोजी गोपाळ इन्नानी यांचा गरबा खेळताना मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी 25 वर्षीय सुशील काळे यांचा मृत्यू झाला.
मुंबईमध्ये मुलुंड परिसरात परिसरात 1 ऑक्टोबरच्या रात्री ऋषभ लहरी या युवकाचा मृत्यू झाला. गरबा खेळताना त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.विरारमध्ये मनीषकुमार जैन या युवकाचा गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूच्या धक्याने वडिलांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर बुलढाण्यामध्ये हॉटेल व्यावसायिक असलेल्या विशाल पडधरीया (47 वर्ष) यांचाही गरबा खेळताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
दरम्यान, मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 2020 साली 25 हजारांहून अधिक लोकांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी अनेक प्रसिद्ध कलाकार आणि व्यक्तींचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.