नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१९ साली साताऱ्यात मुसळधार पावसात भासहन करून सर्व कार्यकर्ते आणि राजकारण्यांना त्यांचा आदर्श घ्यायला भाग पडले होते. त्यांच्या या कृतीमुळे २०१९ मधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीआधी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना निवडून येण्यासाठी मदत झाली होती. दरम्यान, आता या घटनेला ३ वर्ष लोटली आहेत. शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत कार्यकर्त्यांची मनं जिंकली आहेत.
काँग्रेस खासदार राहुल गांधींनी मुसळधार पावसात कर्नाटकाच्या म्हैसुरमध्ये भाषण केले आहे. त्यांच्या या सभेचा व्हिडीओ काँग्रेसने ट्विटरवर पोस्ट केला आहे. कुठलाही अडथळा ‘भारत जोडो’ यात्रेला लक्ष्य गाठण्यापासून रोखू शकत नाही, असे कॅप्शन या पोस्टला देण्यात आले आहे.
No excuses. Only passion.
There is no hurdle big enough to stop #BharatJodoYatra from achieving its goal. pic.twitter.com/puKgKeVZ1E
— Congress (@INCIndia) October 2, 2022
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सुरू आहे. कन्याकुमारीतून सुरू झालेल्या या यात्रेचा मुक्काम सध्या कर्नाटकात आहे. “भारताला एकजूट करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. भारताचा आवाज उठवण्यापासून आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही”, असा संदेश या पोस्टद्वारे काँग्रेसने दिला आहे.
काँग्रेसने कन्याकुमारीतून साडेतीन हजार किलोमीटरची पदयात्रा सुरू केली आहे. महागाई, बेरोजगारी तसेच जीएसटीमुळे देशात निर्माण झालेल्या आर्थिक विषमतेकडे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसकडून ही यात्रा करण्यात येत आहे. केंद्र सरकारविरोधात देशातील जनतेला संघटित करणे, या पदयात्रेचे लक्ष्य आहे.