नवी दिल्ली – भारतातील महागाई बऱ्याच महिन्यापासून सात टक्क्यांच्या वर आहे. मात्र ती हाताबाहेर गेलेली नाही. तिच्यावर नियंत्रण प्रस्थापित केले जाऊ शकते, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना सीतारामन म्हणाल्या की, जागतिक पातळीवर असलेली महागाई पाहता भारतातील महागाई निश्चितच नियंत्रणात असल्यासारखी परिस्थिती आहे. महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने कालच व्याजदरात 0.50 टक्क्याची वाढ केली होती. त्या अगोदर रिझर्व्ह बॅंकेने याच कारणासाठी व्याजदरात 1.40 ट क्के वाढ केलेली आहे.
तसेच संपूर्ण वर्षात महागाई 6.7 टक्के राहील आणि त्यानंतर महागाई कमी होऊन पाच टक्के होईल असे रिझर्व्ह बॅंकेने काल स्पष्ट केले होते. मुळात महागाईचा दर दोन ते सहा टक्क्यादरम्यान ठेवण्याची सूचना अर्थ मंत्रालयाने रिझर्व्ह बॅंकेला केलेली आहे.
मात्र गेल्या अनेक महिन्यापासून ही महागाई सहा टक्क्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. महागाईचा दर जास्त असल्यामुळे आणि व्याजदर जास्त असल्यामुळे भांडवलाचा वापर कमी होऊन त्याचा विकासदरावर परिणाम होत आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बॅंकेने चालू आर्थिक वर्षाचा विकास दर कमी होऊन केवळ सात टक्के राहील असा अंदाज काल जाहीर केला आहे.
भारतातील महागाईचा दर विकसित देशापेक्षा कितीतरी कमी आहे. त्याचबरोबर भारताचा विकासदर विकसित देशापेक्षा कितीतरी जास्त आहे. रशिया- युक्रेन युद्ध आणि इतर कारणामुळे जागतिक परिस्थिती बिघडली आहे. मात्र याचा इतर देशापेक्षा भारतीय अर्थव्यवस्थेवर कमी परिणाम झाला आहे. त्याचबरोबर आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्था अधिक वेगाने पुढे जाणार आहे असे सितारामन म्हणाल्या.