नवी दिल्ली – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेच पदावर कायम रहावेत या मागणीसाठी त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यामुळे कॉंग्रेसशासित राजस्थानमध्ये प्रचंड राजकीय संकट उद्भवले आहे. आता पेच मिटवण्यासाठी निर्णयाचा चेंडू कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कोर्टात गेला आहे. तूर्त, सोनियांनी पक्षाच्या निरीक्षकांकडून राजस्थानमधील घडामोडींबाबत लेखी अहवाल मागवला आहे.
कॉंग्रेस श्रेष्ठींच्या इच्छेनुसार गेहलोत पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास राजी झाले. त्या निवडणुकीला सामोरे जाण्याआधी गेहलोत यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागणार असल्याचे संकेत कॉंग्रेसच्या गोटातून देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर, रविवारी सायंकाळी राजस्थानमध्ये कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली. त्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केली जाऊ शकते. तरूण नेते सचिन पायलट यांच्याकडे धुरा सोपवली जाऊ शकते, अशी कुजबूज सुरू झाली. बैठकीसाठी कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक म्हणून मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन हे नेते राजस्थानात दाखल झाले. पण, घडले भलतेचं.
कॉंग्रेसच्या 108 आमदारांपैकी गेहलोत यांचे समर्थक असणाऱ्या 82 आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले. ते बैठकीकडे न फिरकल्याने बैठक झालीच नाही. पायलट यांना विरोध दर्शवण्यासाठी आणि गेहलोत यांना पदावर कायम ठेवण्याच्या मागणीसाठी संबंधित आमदारांनी राजीनामास्त्र उगारले. बैठकीसाठी स्वत: गेहलोत पक्ष निरीक्षक, पायलट आणि इतर काही आमदारांसमवेत उपस्थित होते. पण, बंडाचे निशाण फडकावणाऱ्या आमदारांनी बैठकस्थळी जाण्याचे टाळले. कॉंग्रेस अध्यक्षपद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर म्हणजे 19 ऑक्टोबरनंतर नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केली जावी, अशीही त्यांची मागणी असल्याचे समजते.
दरम्यान, खर्गे आणि माकन यांनी सोमवारी दिल्लीला परतल्यानंतर सोनियांची भेट घेतली. राजस्थानमधील घडामोडींची माहिती सोनियांना देण्यात आली. त्यांनी खर्गे आणि माकन यांच्याकडून तपशीलवार अहवाल मागवला आहे. तो प्राप्त झाल्यानंतर सोनिया काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. गेहलोत यांच्या समर्थकांची कृती म्हणजे बेशिस्त असल्याची तीव्र प्रतिक्रिया माकन यांनी दिली. त्यामुळे कॉंग्रेसकडून कारवाई केली जाणार का, याविषयीही उत्सुकता आहे.
कमल नाथ करणार मध्यस्थी?
कॉंग्रेसचे मध्यप्रदेश प्रदेशाध्यक्ष कमल नाथ यांना पक्षश्रेष्ठींनी तातडीने दिल्लीला पाचारण केले. राजस्थानमधील पेच सोडवण्यासाठी त्यांच्यावर मध्यस्थी करण्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. नाथ यांचे गेहलोत यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे मानले जाते.