नांदेड (प्रतिनिधी) :- जैवतंत्रज्ञान ही दुधारी तलवार आहे, म्हणून जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करतांना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जैवविविधता हे हवामान बदलाला तोंड देणारं सुरक्षाकवच असल्याचे मत पुणे येथील पर्यावरण शिक्षण केंद्राचे कार्यक्रम संचालक सतीश आवटे यांनी मांडले.
माध्यमशास्त्र संकुल आणि भूगर्भशास्त्र संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि युनिसेफ यांच्या सहयोगाने बुधवारी (दि. २१) ‘हवामानातील बदल’ या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सतीश आवटे हे हवामानातील बदलासंबंधी मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक प्रो. डॉ. दीपक शिंदे, भूगर्भशास्त्र संकुलाचे संचालक प्रो. डॉ. अविनाश कदम, युनिसेफच्या संवादतज्ज्ञ स्वाती मोहपात्रा, माध्यम सल्लागार श्रुती गणपत्ये आदींची ऑनलाईन उपस्थिती होती.
पुढे मार्गदर्शन करताना सतीश आवटे म्हणाले की, हवामान बदल हा सगळ्यांना सारख्या पद्धतीनं आणि सारख्या प्रमाणात प्रभावित करत नाही. हवामान बदलाचा सर्वात जास्त प्रभाव हा गरीब, अल्पभूधारक शेतकरी, भटके समुदाय, डोंगराळ भाग, कमी पावसाचे दुष्काळी भाग, बेटे, नद्या, समुद्र किनाऱ्यालगतचे प्रदेशावर पडतो, असेही आवटे म्हणाले.
तापमान वाढ रोखण्यासाठी अजून विलंब न करता योग्य पावलं उचलण्याची गरज आहे. स्मार्ट ऐवजी शहाणी शहरं निर्मिती, सौर-बायोमास ऊर्जेचा वापर वाढवणं, माती आणि पाणी सवर्धन, त्या-त्या ठिकाणच्या माती, हवा आणि पाण्याला अनुसरून शेती आणि वृक्ष लागवड केली पाहिजे. समुद्र, माती आणि हवामान बदल हे मानवाने दुर्लक्षित केलेले पण अत्यंत कळीचे विषय आहेत, असे विचार सतीश आवटे यांनी मांडले.
अवकाळी, अतिवृष्टी, ढगफुटी सारख्या घटनांचा गावपातळीवर इशारा देणारी हवामान संशोधन यंत्रणा अधिक बळकट झाली पाहिजे. सोबतच प्रसारमाध्यमांनी विज्ञान आणि सखोल अभ्यासावर आधारित पत्रकारितेला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे आवाहन देखील हवामानतज्ज्ञ सतीश आवटे यांनी केले.
या ऑनलाईन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची आणि माती व पाणी जैवविविधता संवर्धनाची सविस्तर माहिती दिली. विद्यापीठ प्रदूषण मुक्त वातावरण करण्यासाठी व जैवविविधता जोपासण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. डॉ. दीपक शिंदे यांनी केले. ऑनलाईन उपस्थितांना ई-प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
या ऑनलाईन कार्यशाळेला प्रो. डॉ. राजेंद्र गोणारकर, प्रो. डॉ. रमजान मुलाणी, प्रो. डॉ. दीपक पानसकर, डॉ. सचिन नरंगले, डॉ. कैलाश यादव, प्रा. प्रज्ञाकिरण जमदाडे, प्रा. गिरीश जोंधळे, प्रा. प्रीतम लोणेकर, डॉ. बी. एस. सुरवसे, डॉ. सुनील चोळके, डॉ. चंद्रकांत बाविस्कर, डॉ. जयंत बोरगावकर, डॉ. ज्ञानोबा मुंढे, डॉ. पी. ए. खडके, डॉ. टी. विजयकुमार, डॉ. एच. एस. पाटोदे, डॉ. ए. बी. भोसले, डॉ. वी. एम. वाघ, डॉ. वाय. पी. लोलगे, प्रा. डी. एन. साबळे, गजानन हुंडे आदीसह मोठ्या संख्येने शिक्षक, विद्यार्थी, अभ्यासक उपस्थित होते.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रीतम मरळ यांनी केले तर डॉ. अविनाश कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.