कोथरूड, दि. 28 -चांदणी चौकातून मुळशीकडे जाणाऱ्या सर्व लेनचे काम जवळपास पूर्ण होत आले. त्यामध्ये बायपास असलेल्या भुयारी मार्गाचे काम अपूर्ण असून, सध्या हा भुयारी मार्ग “जलतरण तलाव’ बनला आहे. त्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात ही अस्वस्था असेल तर भविष्यात या भुयारी मार्गाची काय स्थिती असेल. तसेच डेंगीच्या तापाने शहर तापले असताना, या पाण्यामुळे डासांची पैदास होऊन आजारांना निमंत्रण मिळत आहे. अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चांदणी चौकात नवीन उड्डाणपूल आणि रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना दररोज कोंडी आणि धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. खोदकाम आणि पावसाची रिपरिप यामुळे रस्त्यांवर चिखल आल्यामुळे रस्ता निसरडा झाला आहे. एवढेच नव्हे, तर चांदणी चौकातून मुळशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र, सध्या या मार्गावरील रस्ता पाण्याखाली गेला आहे. पाणी जाण्यासाठी जागाच नसल्यामुळे निम्मा भुयारी मार्ग पाण्यात बुडाला आहे. त्यातच पाणी साचून असल्यामुळे डासांची पैदास होण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे तत्काळ हे पाणी काढण्यात यावे, तसेच भविष्यात ही समस्या पुन्हा उद्भवू नये, यासाठी पाणी जाण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे.
अधिकाऱ्यांचे लक्ष गेले नाही का?
मागील अनेक दिवसांपासून या भुयारी मार्गामध्ये पाणी साचलेले आहे. आता पाऊसही थांबला. तरीही अद्याप पाण्याचे तळे साचलेलेच आहे. त्यामुळे आजारांना निमंत्रण मिळत आहे. असे असताना अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष गेले नाही का, गेले असेल तर उपाययोजना का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे अचानक कोणी गेल्यास पाण्यात बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही.