प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 26 – मध्य रेल्वे असो, वा दक्षिण मध्य रेल्वे. या दोन्ही विभागांच्या विसंवादात मराठवाड्यातील रेल्वे प्रवासी अक्षरश: पिचला जात आहे. यंदाच्याही गौरी-गणपती उत्सवासाठी पुणे-मुंबई शहरांतून मराठवाड्यासाठी एकही जादा ट्रेन सोडण्यात आलेली नाही. विशेष त्यामुळे मध्य रेल्वे मराठवाड्याच्या प्रवाशांवर सातत्याने अन्याय करते, ही भावना बळावली आहे. तर, दुसऱ्या बाजूला दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड आणि अन्य स्थानकांवरून सर्वच जादा ट्रेन्स तेलंगणा आणि आंध्र प्रदेशासाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे “मराठी’ प्रवासी मात्र रेल्वेने उपेक्षित ठेवला आहे.
मराठवाड्याच्या वाट्याला “काहीच नाही’मराठवाड्यातील विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात मुंबई व पुणे येथे वास्तव्यास आहेत. मात्र, दक्षिण मध्य रेल्वे फक्त शिर्डी अथवा विजयवाडा, काचीगुडा, हैदराबाद आणि यशवंतपूर येथे जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडते. एरवी आणि उत्सव काळातही पुणे-मुंबईसाठी वारंवार मागणी करूनही ट्रेन सुरू केली जात नाही.
आताही गणेशोत्सव, गौरीपूजनासाठी पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर किंवा नागपूर यापैकी एकाही स्थानकावरून मध्य रेल्वेने मराठवाड्यासाठी एकही गाडी सोडलेली नाही. यामुळे रेल्वे विभाग मराठवाड्यावर अन्याय करत असल्याचे चित्र आहे.
उपलब्ध ट्रेन्सची वेटिंग लिस्ट सध्या पुणे येथून नांदेडसाठी पनवेल-नांदेड आणि पुणे-नांदेड एक्स्प्रेस या दोन ट्रेन धावतात. तर, मुंबई-पुणे-उस्मानाबाद-लातूर ही एक्स्प्रेस दररोज एकदाच धावते. तिला पर्याय आवश्यक आहे. हैदराबाद एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस आता हडपसर येथून धावते. ती नियमित करण्याची मागणी आहे.
या सर्व ट्रेन्सचे उत्सव काळातील तिकीट बुकिंग फुल्ल आहे. अमरावती-पुणे व अजनी-एलटीटी एक्स्प्रेस (कुर्ला) या दोन्ही ट्रेन्स नियमित करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे प्रवाशांची फरफट होत आहे.
दरवर्षी रेल्वे संघटनांकडून या काळात मुंबई, पुण्यासाठी विशेष रेल्वेची मागणी होते. प्रत्यक्षात काहीच होत नाही. दक्षिण मध्य रेल्वेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना वगळता केवळ विशेष रेल्वेने दक्षिणेतल्या शहरांना जोडण्यात येतात. यात प्रामुख्याने विजयवाडा, विशाखपट्टणम, काचिगुडा, हैदराबाद आदींचा समावेश आहे. मध्य रेल्वेने याबाबत सकारात्मक विचार करावा.
– अरुण मेघराज, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी महासंघ
सध्या पुणे येथून नांदेडसाठी दोन ट्रेन्स नियमित धावतात. लातूरसाठी एक ट्रेन रोज धावते. प्रवाशांचे तिकीट बुकिंग किंवा वेटिंग लिस्ट पाहून रेल्वे प्रशासन त्या-त्या वेळी पुढील निर्णय घेते. सद्यस्थिती पाहता नांदेड, परभणी, जालना या शहरांकडे धावणाऱ्या प्रवाशांच्या संख्येची समिक्षा आम्ही करत आहोत. जादा ट्रेनबाबत रेल्वे बोर्ड योग्य निर्णय घेऊ शकते.
– मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग