बक्सार, (बिहार) – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या वाहनांच्या ताफ्यावर आज दगडफेक करण्यात आली. बक्सार जिल्ह्यातील नंदन भागात समीक्षा यात्रेसाठी नितीश कुमार आले असताना हा प्रकार घडला. मात्र या दगडफेकीमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांना कोणतीही इजा झाली नाही. काही सुरक्षा रक्षक मात्र या दगडफेकीमध्ये जखमी झाले.
सातत्याने खंडीत होत असलेला वीज पुरवठा आणि अपुऱ्या पाणी पुरवट्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या रागातून काही व्यक्तींनी केलेल्या या दगडफेकीमुळे नितीश कुमार यांच्या ताप्यातील कारच्या खिडक्या फुटल्या. या दगडफेकीमुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात कोणताही फेरबदल झाला नाही, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.
नितीश कुमार पुढील कार्यक्रमासाठी पुढच्या गावाला निघून गेले. तेथे त्यांनी 272 कोटी रुपयांच्या 168 योजनांचा प्रारंभ केला.
या प्रकारानंतर डुमराव याथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना नितीश कुमार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्याचा विकास करण्याच्या आपल्या कटिबद्धतेमुळे काही लोक अस्वस्थ झाले आहेत. ते इतरांची दिशाभूल करून लोकांना भडकावत आहेत. मात्र लोकांनी अशा छोट्या गोष्टींवरून अस्वस्थ होऊ नये, असे नितीश कुमार म्हणाले. जर कोणी घोषणाबाजी केली किंवा काळे झेंडे दाखवले तर त्याबाबत फार चिंता करू नये, अशी सूचनाही त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना केली.