रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणारी किंवा गंभीर इजा होणारी व्यक्ती सामाजिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण असो किंवा सर्वसामान्य असो आपल्या कुटुंबासाठी, परिवारासाठी आणि राष्ट्रासाठी ती कायमच अमूल्य असते.
एकीकडे भारत स्वातंत्र्याचा 75 वा समारोह साजरा करण्यात दंग असतानाच महाराष्ट्रात 14 ऑगस्टच्या भल्या सकाळी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. महाराष्ट्राला किंवा भारताला अपघाती मृत्यू हे काही नवीन नाहीत. भारतात दररोज शेकडो नागरिक हे महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरून (एक्स्प्रेस वे) प्रवास करताना अपघातात जखमी होतात, तर काही मृत्यूमुखी पडतात. पण जेव्हा समाजात महत्त्वपूर्ण स्थान असलेली व्यक्ती अपघाती मृत्यूमुखी पडते तेव्हा त्या घटनेची पुढील काही दिवस जोरदार चर्चा होते आणि नंतर पुन्हा परिस्थिती “जैसे थे’ असते. रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडणारी किंवा गंभीर इजा होणारी व्यक्ती सामाजिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण असो किंवा सर्वसामान्य असो आपल्या कुटुंबासाठी, परिवारासाठी आणि राष्ट्रासाठी ती कायमच अमूल्य असते. म्हणून रस्ते अपघात देशाच्या कोणत्याही भागांत झाला आणि त्यात कोणाचाही जरी मृत्यू झाला तर तो दुःखदच आहे.
भारतातील रस्ते अपघात
डिसेंबर, 2021 मध्ये केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेला दिलेल्या माहितीनुसार भारतात 2020 मध्ये (लॉकडाऊनचा काळ सोडला तर) 47 हजार 984 तर 2019 मध्ये 53 हजार 872 लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडले. जागतिक आकडेवारीचा विचार केला तर, जगात दरवर्षी रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात अंदाजे 1.3 दशलक्ष लोक मृत्यूमुखी पडतात तर अंदाजे 50 दशलक्ष लोक गंभीररित्या जखमी होतात. संपूर्ण जगात होणाऱ्या रस्ते अपघातात भारताचा वाटा 11 टक्के इतका आहे.
भारतातील रस्ते अपघाताची कारणे
भारतात जितके रस्ते अपघात होतात त्यातील मुख्य अपघात हे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग व द्रुतगती मार्गांवर (एक्स्प्रेस वे) होतात.
रस्त्यांची रचना : भारतातील अनेक रस्ते अशास्त्रीय पद्धतीने बनविले जात असल्यामुळे रस्ते अपघात हे प्रामुख्याने होत असल्याचे बोलले जाते.
वाहनांची रचना आणि स्थिती : अनेकदा चालक आपल्या वाहनात हवे तसे बदल करून घेतो (मॉडिफाय व्हेकल) जे पूर्णपणे अशास्त्रीय असते; त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. तसेच वर्षानुवर्षे वापरात असलेले जुनी, भंगार झालेली वाहने योग्य दुरुस्ती व देखभाल न करता रस्त्यावर हाकल्याने मोठे अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय वाहतुकीचे नियम न पाळणे, दारू पिऊन वाहन चालविणे, विरुद्ध दिशेने प्रवास करणे, वाहन चालवताना मोबाइल फोनचा वापर करणे अशी अनेक कारणे भारतातील रस्ते अपघातांसाठी देता येतील.
समाजावर होणारे परिणाम
आपल्या जवळच्या व्यक्तीचा अचानक झालेला मृत्यू अत्यंत धक्कादायक व दुःखद असतो. लेखाच्या सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणारी व्यक्ती ही आपल्या कुटुंबासाठी आणि राष्ट्रासाठी कायमच अमूल्य असते. त्यामुळे जेव्हा अशा प्रकारचे अपघात होतात तेव्हा त्या अपघाताचे समाजावर जे नकारात्मक परिणाम होतात त्याचे आपण सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवर विश्लेषण करू शकतो.
सामाजिक/राष्ट्रीय : अपघातात होणाऱ्या मृत्यूमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दरवर्षी जवळपास 15.71 दशअब्ज अमेरिकी डॉलर ते 38.81 दशअब्ज अमेरिकी डॉलरचे नुकसान होते जे भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या जवळपास 0.55 टक्के ते 1.35 टक्के इतके आहे. तसेच मृत्यूमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारे मनुष्यबळही कमी होते.
कौटुंबिक/वैयक्तिक : ज्या व्यक्तीच्या घरात अपघाती मृत्यू होतो आणि जर ती व्यक्ती घरातील एकमेव कमवती व्यक्ती असेल तर संपूर्ण कुटुंब हे दारिद्य्ररेषेखाली येते (एकूण अपघाती मृत्यूच्या जवळपास 56 टक्के) परिणामी, घरातील महिला आणि तरुण किंवा विद्यार्थ्यांवर कुटुंब चालवण्याची जबाबदारी येते त्यामुळे कुटुंबाचा सामाजिक स्तर घसरतो. शिक्षण, रोजगार, व्यक्तिमत्त्व विकास अशा प्रमुख बाबींपासून ते कुटुंब दूर जाते. अंतत: गरिबी आणि गुन्हेगारीच्या दलदलीत कुटुंब अडकले जाते.
भारत सरकारच्या उपाययोजना
रस्त्यावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे भारत सरकारसह जगातील अनेक राष्ट्रांनी गांभीर्याने उपाययोजना सुरू केल्या आहेत. संयुक्त राष्ट्र आमसभेने 2020 च्या अंतापर्यंत जगातील सर्व राष्ट्रांनी रस्ते अपघातात होणारे मृत्यू 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य निर्धारित केले होते. भारत सरकारने या लक्ष्याची अंमलबजावणी करण्यासाठी 2024-25 पर्यंत अपघाती मृत्यू 50 टक्क्यांनी कमी करण्याचे तर 2030 च्या अंतापर्यंत 100 टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याशिवाय भारत सरकारने मोटर कार (दुरुस्ती) कायदा, 2019, राष्ट्रीय महामार्ग (जमीन आणि वाहतूक) अधिनियम, 2020, एनएचएआयची स्थापना अशा अनेक उपाययोजना केल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यांतील उच्च न्यायालयांनी रस्ते अपघाताची वेळोवेळी गंभीर दखल घेत केंद्र व राज्य सरकारला अनेकदा सूचना केल्या आहेत. संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टांपैकी उद्दिष्ट क्र. 1 ते उद्दिष्ट क्र. 11 ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रस्ते अपघात आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूशी व गंभीर इजा यांच्याशी निगडित आहेत. त्यामुळे रस्ते अपघात हा केवळ राष्ट्रीय नाही तर एक आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे आणि त्यावर युद्धपातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे.
स्वप्निल श्रोत्री