औंध, दि. 19 (प्रतिनिधी) -बाणेर, बालेवाडी परिसराचे नागरीकरण वेगाने झाले आहे. नोकरी, व्यवसाय, उद्योग यासाठी राज्यासह देशभरातून लोक येथे येत आहेत. यातून या परिसरात घरांची मागणीही वाढलेली आहे. यातून नागरिकांची गर्दी, वर्दळ वाढत आहे. याच कारणातून बालेवाडी हायस्ट्रिट परिसर तसेच बाणेर मुख्य रस्त्याचा वापर पार्किंगसाठी होत आहे. त्यातही वाहन चालकांना शिस्त नसल्याने रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीही होत आहे. विशेष म्हणजे अशा बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने रस्त्यावर कोठेही वाहून उभे करण्याचा प्रकार वाढू लागला आहे.
बाणेर, बोलवाडी मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांनी पार्किंगची सुविधा उपलब्ध केलेली नसल्याने त्यांच्याकडे येणारे ग्राहक रस्त्यावर जागा दिसेल तेथे वाहन उभे करीत आहेत. दोन वाहनांमध्ये जागा असली तरी त्या जागेत वाहन उभे करून चालक खरेदी तसेच त्याच्या कामासाठी जात आहेत.
हॉटेल व्यावसायिकांकडे नियमानुसार पार्किंग असल्याशिवाय परवाना देण्यात येत नाही. परंतू, याउलट स्थिती असताना बाणेर, बालेवाडी परिसरात बहुतांश हॉटेल व्यावसायिकांना परवाना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांचे वाहन किमान रस्त्यावर तरी योग्य पद्धतीने उभे आहे का? याची तसदीही संबंधितांकडून घेतली जात नसल्याने येथील मुख्य रस्त्याचा वापर पार्किंगसाठीच होऊ लागला आहे.
ग्राहकांसाठी पार्किंगची सुविधाच नसल्याने ग्राहक जागा मिळेल तेथ वाहने उभी करीत आहेत. अशी वाहने वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत असतान वाहतूक पोलिसांकडून मात्र दुर्लक्ष करण्यात येत आहे.
बाणेर विभागासाठी स्वतंत्र वाहतूक पोलीस चौकी सुरू करण्याचे काम चालू आहे. थोड्याच दिवसामध्ये चौकी सुरू होईल. बाणेर-बालेवाडी परिसरात सातत्याने वाहनांवर कारवाई होत आहे. ज्याठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंगमुळे अडथळा होतो, अशा ठिकाणी पी 1, पी 2 चे प्रस्ताव देण्यात आले आहेत. ज्याठिकाणी नागरिकांना अडथळा होत असेल त्याठिकाणी त्वरित कारवाई करण्यात येते.
– बाबासाहेब कोळी, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग चतु:शृंगी पोलीस स्टेशन