कोलकाता – भ्रष्टाचारप्रकरणी गोत्यात येऊन तुरुंगात गेलेले प. बंगालचे माजी मंत्री व तृणमूल कॉंग्रेसचे नेते पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्याकडून मिळालेली 50 कोटींची रोकड आणि 5 कोटींचे दागिने हे आरबीआयच्या तिजोरीत जमा करण्यात आले आहेत. जर त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले तर त्यांना ही सारी संपत्ती परत केली जाईल. मात्र आरोप खरे निघाले तर सगळी संपत्ती ही सरकार जमा होणार आहे. त्याचबरोबर दोघांनाही सात वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
पार्थ चॅटर्जी यांची आता 31 ऑगस्टपर्यंत जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. हायकोर्टाने त्यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. या सुनावणीत पार्थ यांना गंभीर आजार असल्याचा युक्तिवाद वकिलांकडून करण्यात आला. ते फरार होणार नाहीत असेही सांगण्यात आले. मात्र, तरीही कोर्टाने त्यांना जामीन दिलेला नाही.
अर्पिता मुखर्जी हिच्या नावे 31 विमा पॉलिसी असल्याचे समोर आले आहे. यात नॉमिनी म्हणून पार्थ चॅटर्जी यांचे नाव आहे. 60 पेक्षा जास्त बॅंकेची खाती समोर आली आहेत. या खात्यांतही कोट्यवधी रुपये जमा आहेत. हे पैसे बनावट कंपन्या स्थापन करून त्यात ट्रान्सफर करण्यात आले होते. या सगळ्या कंपन्या केवळ कागदोपत्री आहेत, प्रत्यक्षात यातील एकही कंपनी अस्तित्वातच नाही.
या सगळ्या कंपन्या आणि व्यवहारांची चौकशी अद्याप सुरू आहे. 2012 सालात या दोघांच्या नावे एक पार्टनरशीप डीड करण्यात आली होती. आता यांनी ट्रस्टच्या माध्यमातून नवा काही गैरव्यवहार केला आहे का, याचाही शोध घेण्यात येतो आहे.