पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा सक्षम करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या आंद्रा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या 24 ऑगस्टपर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येईल. वीज जोडणी करुन प्रकल्प कार्यान्वित होईल. त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जलशुद्धीकरण केंद्रांतील पाण्याचे टेस्टिंग करण्यात येईल. त्यानंतर सप्टेंबरअखेर अर्थात घटस्थापनेच्या मुहुर्तावर शहरवासीयांना आंद्रा धरणातून शुद्ध पाणी येईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिल्याचा दावा आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.
समाविष्ट गावांसह शहराचा पाणी पुरवठा सुरळीत आणि सक्षम करण्यासाठी आंद्रा व भामा-आसखेड प्रकल्प महत्वाचा आहे. आंद्रा प्रकल्पांतर्गत तळवडे आणि निघोजे येथील इंद्रायणी नदीजवळ उपसा केंद्र या ठिकाणी पंपिंग मशिनरी उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. प्रकल्पासाठी 22 केव्ही उच्चदाब क्षमतेची वीजजोडणी करण्याचे काम 24 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर नदीजवळ उपसा करुन पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाईल. चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम येत्या 20 दिवसांत पूर्ण होईल, त्यानंतर पाण्याचे टेस्टिंग सुरू होईल. सर्व तपासण्या केल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शुद्ध पाणी पुरवठा शहराला होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केल्याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
सद्यस्थितीला पिंपरी-चिंचवडसाठी पवना धरणातून पाणी पुरवठा होतो. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने महापालिकेतील भाजपाच्या सत्ताकाळात आंद्रा धरणातून 100 एमएलडी आणि भामा आसखेडमधून 167 एमएलडी पाणी पिंपरी-चिंचवडला मिळण्यासाठी प्रकल्पाला मंजुरी मिळाली. अखेर सर्व अडचणींवर मात करीत प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकर आता पाण्यासाठी स्वयंपूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.