सविंदणे (प्रतिनिधी) : टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील डोंगरगण हद्दीत हॉटेल रानवारा येथे रविवारी (दिनांक ७) हॉटेल कामगाराचा खून झाला होता. हॉटेल मधील दुसरा कामगार अनंता रघुनाथ कांबळे (रा. कोळंबे, ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी) हा त्याच रात्री फरार झाल्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याचा तपास काढून पोलिसांनी ४८ तासात त्याला ताब्यात घेतले आहे.
महेश उर्फ सुनिल नामदेव सरोदे (वय ४५ वर्ष) , रा. दावतपुर, ता. औसा, जि.लातुर याचा खून करून आरोपी अनंता कांबळे हा कोणास काहीएक न सांगता गुन्हयात वापरलेले हत्यार घेवून पळून गेला होता. त्यामुळे त्यास लवकरात लवकर अटक करणे पोलिसांपुढे आव्हानात्मक होते.
शिरूर पोलिसांनी तात्काळ टाकळी हाजी चौकी, शिरूरचे डी. बी. पथक व कर्मचारी यांचे वेगवेगळे पथक तयार करून आरोपीचे मुळ गावी, रत्नागिरी तसेच पुणे शहर व आजुबाजुचे परिसरात गोपनिय बातमीदार तसेच तांत्रिक पध्दतीने शोध घेतला. गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून डी.बी.पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पवार आणि पोलीस अमलदार प्रविण पिठले यांनी अखेर विरार रेल्वे स्टेशन (ठाणे) येथे ५ तास तपास घेवून आरोपीस शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेतले.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक मितेश पटटे व शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि.अमोल पन्हाळकर, डी.बी. पथक प्रमुख पो.उ.नि. अभिजीत पवार, सहा फौजदार नाजिम पठाण, पो.ना. धनंजय थेऊरकर, नाथसाहेब जगताप,पोलीस अंमलदार प्रविण पिठले, विशाल पालवे, संतोष साळुंके, दिपक पवार, सुरेश नागलोत, पोलीस मित्र श्री. दिपक बढे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि.अमोल पन्हाळकर हे करीत आहे.