मराठीतील सुप्रसिद्ध कवी वसंत बापट यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता 25 जुलै रोजी होत असून, त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख.
कविता हा कवीच्या मनाचा आरसा असतो, असे म्हटले जाते. अगदी प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक काळात अनेक कवींनी आपल्या लीलया लेखणीद्वारे काव्यरचना करून काव्य गगनात आपलं स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ केले. याच काव्य पंक्तीतील काव्यगगनात ऋतुराज वसंताप्रमाणे ज्यांचे काव्य सदा बहरले ते म्हणजे कविवर्य वसंत बापट. त्यांचे खरे नाव विश्वनाथ वामनराव बापट असून 25 जुलै 1922 रोजी सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथे त्यांचा जन्म झाला. वडील संस्कृतचे पंडित असल्याने त्यांच्यावर नकळत बालपणापासून संस्कृत काव्य व व्याकरण यांची आवड निर्माण झाल्याने, त्यांनी बालपणापासूनच छंदोबद्ध कविता रचण्यास सुरुवात केली.
त्याचप्रमाणे त्यांनी नृत्यनाट्ये, समूह गीते, पोवाडे, तमाशा, वग, लावणी यांचे लेखन केले. तुरुंगात असताना त्यांनी बंगाली भाषेचा अभ्यास केल्याने रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्याची भाषांतरे केली व त्यांचा छंदोबद्ध रचनेकडे ओढा वाढला. तसेच 1962 च्या भारत-चीन युद्धात त्यांनी आपल्या तळपत्या लेखणीद्वारे या युद्धाचा निषेध करणारे “उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू’, “शिंग फुंकिले रणी वाजतात चौघडे’, “सदैव सैनिका पुढेच जायचे’ या सारखी शौर्यगीते लिहिली. त्यांचा मराठी चित्रपटसृष्टीशी संबंध आल्याने त्यांनी चित्रपटगीते लिहिली. “उंबरठा’ या चित्रपटातील “गगन सदन तेजोमय’ ही प्रार्थना आजही सर्व अबालवृद्धांच्या तोंडी आहे. “शामची आई’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी आचार्य अत्रे, राजकवी यशवंत यांच्यासह चित्रपटातील पदे लिहिली. त्यातील “छडी लागे छमछम’ हे गीत बापट यांचे असून, या चित्रपटात त्यांनी अत्रे यांचे सहकारी म्हणून बारक्याची उत्तम भूमिकाही साकारली होती.
“बिजली’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह 1952 मध्ये प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहातून देशातील राजकीय आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेवर भावनात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या काव्यसंग्रहास कवी कुसुमाग्रज यांची प्रस्तावना लाभली असून, त्यांनी असे लिहिले आहे, की “बिजली’तून व्यक्त होणारी जीवनदृष्टी प्रागतिक व्यापक आणि सहानुभूतिमय आहे. विषमता, अर्थोपासना आणि दास धनी संबंध यावर उभारलेली समाजरचना नष्ट झाल्याशिवाय माणसाला सुखाचे दरवाजे मोकळे व्हायचे नाहीत, अशी कवीची इच्छा आहे. “झेलमचे अश्रू’, “स्वातंत्र्य कुठे स्वातंत्र्य’, “गांधी मंदिर’ या त्यांच्या गाजलेल्या कविता.
“अकरावी दिशा’, “अनामिकाचे अभंग आणि इतर कविता’, “अहादेश कसा छान’, “तेजसी’, “प्रवासाच्या कविता’, “मानसी’, “मेघहृदय’, “रसिया’, “राजसी’, “शततारका’, “शतकांच्या सुवर्णमुद्रा’, “शिंग फुंकिले रणी’, “सकीना’, “सेतू’ हे त्यांचे काव्यसंग्रह तर “अबडक तबडक’, “आम्हा गरगर गिरकी’, “चंगा मंगा’, “परीच्या राज्यात’, “फिरकी’, “फुलराणीच्या कविता’ हे त्यांचे बालकाव्यसंग्रह तसेच “ताणे बाणे’ हा बापटांच्या आत्मपर स्तंभलेखनातून तयार झालेला लेखसंग्रह आहे. “बारा गावचं पाणी’ हे प्रवासवर्णन आहे. “आजची मराठी कविता’ हे निवडक कवींच्या कवितांचे लेखिका डॉ. चारुशिला बाळकृष्ण गुप्ते यांच्यासह केलेले संपादन प्रसिद्ध आहे. खट्याळ विनोदबुद्धी, धारदार उपहास, बखरीची शैली आणि नाट्यमयता अशा गुणांनी ढंगदार बनलेल्या स्फुटांतून बापटांचे “विसाजी पंतांची वीसकलमी बखर’ हे पुस्तक सिद्ध झाले.
1950 पासून त्यांनी कविवर्य मंगेश पाडगावकर व विंदा करंदीकर यांच्यासह कविता वाचनाचे सामुदायिक कार्यक्रम करून जणू कविता घराघरात पोहोचवली. कवितेचं आकलन हे कवितेच्या वाचनाशी कसं निगडीत असतं, तसंच भाषा ही कवितेचा एक घटक कसा असते याची जाणीव त्यांच्या काव्यवाचनाने करून दिली. त्यांच्या सर्वच कविता म्हणजे जणू शतक उधळणारा लोलकच आहे. प्रीतीविषयक अनुभूती हा बापटांच्या सर्व काव्यसंग्रहातून व्यक्त होणारा मुख्य विषय असून, शृंगार हा त्यांच्या प्रेमभावनेतला जणू गाभाच आहे. त्यांना अनेक जुन्या-नव्या कविता अगदी तोंडपाठ होत्या.
काव्यवाचनाच्या सामुदायिक कार्यक्रमात इतर कवितांसह पाडगावकर यांनी “एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून’ ही कविता, विंदांनी “घेणाऱ्याने घेत जावे’ ही कविता तर वसंत बापट यांनी “दख्खन राणीच्या बसून कुशीत, शेकडो पिल्ले ही चालली खुशीत’ ही कविता अगदी हमखास असायची. त्यांच्याबद्दल बोलताना विंदा करंदीकर म्हणाले, आसपासच्या माणसांना आपलेसे करणारे संभाषण चातुर्य, उमदी, उत्साहीवृत्ती व औचित्याची उपजत जाणीव हे गुण वसंतात होते. ते कायमच स्वतःला चिरतरुण समजत, त्यामुळे “जरी आता जाणारच पटदिशी कवातरी’ असे जरी लिहिले तरी त्यांना म्हातारा हा शब्द आवडत नसे. याबद्दल बा. भ. बोरकर कवितेतून बापट यांच्याबद्दल म्हणतात,
या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे
अमृताचा चंद्र त्यांच्या पालवीच्या आड आहे
यावर मंगेश पाडगावकर म्हणतात –
वसंत हे चैतन्यानं सळसळणार यौवनाच झाड होत
अगदी म्हातारपणीसुद्धा ते यौवनाच झाड होत
अमृताचा चंद्र त्याची कविता आहे
“सेतू’ या काव्यसंग्रहाच्या आरंभी बापटांनी आपली काव्यविषयक भूमिका मांडली आहे. त्यात ते म्हणतात, मी कविता का लिहितो याच एकच उत्तर मला देता येणार नाही. याचाच अर्थ असा की माझी काव्यविषयक भूमिका वारंवार बदलत आलेली आहे. इतकेच नव्हे तर एकाच वेळी एक भूमिका ठेवण्याचेही मला जमलेले नाही.
कवितेतील सौंदर्यावर लुब्ध असणारा, आशावादी वृत्तीचा रसिक कवी अशी त्यांची प्रतिमा त्यांच्या लेखनातून सदा प्रतिबिंबित होते. 1998 मध्ये त्यांना 72 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला तेव्हा कवितेचा सन्मान झाला. आपली वैशिष्ट्यपूर्ण मराठमोळी शब्दकळा वापरून आपल्या खुमासदार आणि वेचक व वेधक रीतीने काव्यनिर्माण करणाऱ्या ऋतुराज वसंतास जन्मशताब्दी निमित्त वंदन!
-अमेय गुप्ते