पुणे – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात प्रेक्षक गॅलरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न भाजप आणि युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळी धक्काबुक्की झाली.
कार्यक्रम सुरू होण्याआधीच या महिला कार्यकर्त्या प्रेक्षागॅलरीत येऊन बसल्या होत्या. कार्यक्रम सुरू झाला. महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी ओळखले आणि बाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. या महिलांजवळ अंडी होती. कार्यक्रमात त्या टाकणार होत्या, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. या महिलांना प्रेक्षागॅलरीतून पोलीसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आणि ताब्यात घेण्यात आले. यानंतर कार्यक्रम संपवून इराणी निघाल्या असता, त्यांच्या वाहनावर अंडी फेकण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केला. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
हे आंदोलन म्हणजे, राजकुमाराला पराभूत केल्याच्या दु:ख आणि रागातून : चंद्रकांत पाटील
“आजपर्यंत केंद्रातील एवढे नेते पुण्यात येऊन गेले, येतात परंतु स्मृती इराणींसमोरच विरोधकांनी का आंदोलन केले याचा उलगडा झाला आहे. कॉंग्रेसच्या राजकुमाराला अमेठीमधून हरवून त्या आल्या आहेत, त्याचा राग त्यांच्या मनात आहे. राजकुमार हरल्याचे दु:ख तुमच्या मनात आजही आहे हे या कृतीतून विरोधकांनी दाखवून दिले आहे. आपल्या नेत्याबद्दल एवढे प्रेम हवे,’ अशी उपरोधिक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. पुस्तक प्रकाशन समारंभ प्रसंगी पाटील बोलत होते. यातूनही हे कार्यकर्ते कोणाच्या गटातील होते, मोठ्या पवारांच्या, छोट्या पवारांच्या की सुळे यांच्या? असा प्रश्न इराणी यांनी विचारल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला.
“हे आंदोलक म्हणजे उदबत्त्या आहेत. त्यांना पायानेही विझविता येते. चिमण्या (दिवे) विझताना त्या अशाच फडफडतात. त्या विझणार आहेत. ज्या विझणार नाहीत त्यांना निवडणुकीत हरवून शांत करावे लागेल,’ असे खासदार गिरीश बापट म्हणाले.