नवी दिल्ली – भारताबरोबरच विविध देशांच्या अर्थव्यवस्थावर करोनाचा प्रदीर्घ काळ परिणाम झाला होता. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नागरिक प्रयत्न करीत असतानाच रिझर्व बॅंकेने व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या पुनरूज्जीवनाला पुढील किमान आठ महिने तरी वेळ लागणार असल्याचे विश्लेषकांना वाटते.
करोनाच्या काळामध्ये जगभरातील रिझर्व बॅंकांनी भांडवल सुलभता मोठ्या प्रमाणात निर्माण करून बाजारात पैसा वाढविला होता. टप्प्याटप्प्याने हा पैसा काढून घेण्यासाठी व्याजदरात वाढ करण्याची रिझर्व्ह बॅंकांची मूळ कल्पना होती. मात्र अचानक रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत क्रूडसह विविध मालाच्या किमती वाढून महागाई भडकली आहे.
त्यामुळे रिझर्व्ह बॅंका टप्प्याटप्प्याने व्याजदरात वाढ करण्याऐवजी मोठ्या प्रमाणात व्याजदर वाढ करू लागल्या आहेत. सुरुवातीला रशिया- युक्रेन युद्ध एखाद्या आठवड्यात संपेल असे वाटले होते. मात्र परिस्थितीजन्य कारणांमुळे आता हे युद्ध 78 दिवसानंतरही चालूच आहे. त्यामुळे जागतिक अर्थकारणावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत व्याजदरात वाढ केल्यामुळे भांडवल महाग झाले आहे. त्यामुळे नागरिक आणि उद्योग भांडवलाचा वापर कमी करतील. त्यामुळे वस्तू आणि सेवांची मागणी कमी होणार आहे. करोनामुळे अगोदरच पुरवठ्यावर परिणाम झाला असतानाच युद्धामुळे त्यात आणखी भर पडली आहे.
त्यामुळे पुढील आठ महिने जगभरातील रिझर्व बॅंका महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. गेल्या पंधरवड्यात रिझर्व बॅंकेने रेपो दरात 0.40 टक्क्याची वाढ केल्यानंतर फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25 टक्क्याची वाढ केली आहे. त्यानंतर लगेच बॅंक ऑफ इंग्लंडने व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ केली. आगामी काळामध्ये आणखी व्याजदरात वाढ करणार असल्याचे या बॅंकांनी सूचित केले आहेत. त्यामुळे नागरिक खरेदी कमी करतील आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल.