मुंबई – अनेक मशिदींचे मौलवी आणि असंख्य मुस्लिम बांधव समजूतदारपणा दाखवत भोंग्यांचा वापर थांबवत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर कुणालाही- अगदी युती/आघाडी सरकारलाही जे जमले नाही, ते ‘शिवधनुष्य’ राजसाहेब ठाकरे यांनी यशस्वीपणे पेललं! मातोश्रीत आता फक्त खेळण्यातला धनुष्य-बाण उरला आहे, अशी खोचक टीका मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी शिवसेनेवर केली आहे.
मनसेच्या भोंगे उतरवा आंदोलानवर काल सेनेच्या संजय राऊतांनी टीका करत खिल्ली उडवली होती. त्याला आज शिंदे यांनी उत्तर दिले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात भूमिका घेतली आणि राज्यातच नाही तर देशात हा मुद्दा चर्चेत आला. राज ठाकरे यांनी भोंगे काढण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर राज्य सरकार हरकतीत आले आणि मनसेच्या अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली तर काहींना ताब्यात घेण्यात आले.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी शिवसेनेला आव्हान देण्यास सुरुवात केलीये. दुसरीकडे शिवसेना मनसेच्या मागे भाजपचा हात असल्याचा दावा करतेय. राज्यात भोंग्यावरुन वाद कायम असताना मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे.
भोंगे हा काही राजकीय विषय नाही हे राज यांनी अनेकदा म्हटले होते. अगोदर हा विषय समजून घ्या असे आवाहनही त्यांनी केले होते. त्यांच्या आवाहनानंतर मुस्लिम बांधवांनीही स्वत:हून भोंग्यांचा आवाज कमी केला तर बऱ्याच ठिकाणी भोंगे काढण्यात आले. त्यामुळे समाजात दुही माजणार किंवा वातावरण बिघडणार, गालबोट लागणार ही जी भीती गेले काही दिवस व्यक्त केली जात होती, ती अनाठायी ठरली.
आक्रमक अशी प्रतिमा असलेले राज ठाकरे आणि त्यांची संघटना शांततेतही आंदोलन करू शकते असे कुठेतरी संदेशही गेल्यामुळे मनसेला राज्याच्या राजकारणात पुन्हा पाय रोवण्यास जमीन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र हिंदुत्वाचा मुद्दा हायजॅक झाल्याने आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला आव्हानाच सामना करावा लागणार आहे.