जयपूर – देशात रामनवमीच्या दिवशी सात राज्यांत हिंसाचार झाला. त्याची चौकशी व्हायला हवी. चौकशीसाठी समिती नेमण्याचे धाडस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात आहे का, असा सवाल राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरूवारी केला.
हिंसाचारामागील मूळ कारण शोधण्यासाठी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली जावी. त्या चौकशीतून सर्व काही स्पष्ट होईल. तसेच, भविष्यात तशाप्रकारच्या हिंसाचाराच्या घटना घडणार नाहीत, असे गेहलोत उदयपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
राजस्थानात रामनवमीआधी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्याचा ठपका गेहलोत यांनी भाजपवर ठेवला. राजस्थानमधील पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे तो पक्ष आग लावण्याचा प्रयत्न करत आहे.
धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली केले जाणारे राजकारण धोकादायक आहे. त्याचा देशाला कुठलाही लाभ होत नाही. वैचारिक लढ्याचे स्वत:चे असे स्थान आहे. मात्र, कुणाचे नुकसान होणार नाही यासाठी शांतता आणि बंधूभाव अबाधित राखण्याची जबाबदारी राजकीय नेत्यांची आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.