पुणे -लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होत असूनही नागरिकांकडून लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने लस वाया जाण्याचे प्रमाणही खूप आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात मिळून तब्बल 13 लाख लाभार्थ्यांचा दुसरा डोस शिल्लक आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणेकरांनी लशीचे दोन्ही डोस घ्यावे आवाहन केले. संसर्ग कमी झाल्याने दुसरा डोस आणि बुस्टर डोस न घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात सात लाख नागरिकांनी अद्याप लशीचा दुसरा डोस घेतलेला नाही, तर उर्वरित ग्रामीण भागात सहा लाख नागरिकांनी दुसरी मात्रा घेतलेली नाही. करोना संसर्ग कमी झाला असला, तरी नागरिकांनी लसीचे डोस घ्यावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.