मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकार प्रचंड उदासिन आहे, राज्यात चालू असलेला एसटी कामगारांचा संप मिटणे महत्त्वाचे आहे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार फक्त राज्यात नाहीतर देशासह जगातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्यावर देखील अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचे कोणीही समर्थन करणार नाही, पण हा हल्ला का झाला याचे कारण देखील शोधले पाहिजे, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.
दरम्यान, अमृता फडणवीस या मुंबईत कलाकारांच्या महारोजगार मेळाव्याला संबोधित करत होत्या. या कार्याक्रमाला अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर देखील उपस्थित होते.